- Hindi News
- देश
- शरद पवारांनी साधला अभिजित दिपकेंसोबत संवाद; धर्मेंद्र प्रधानांकडून राजीनाम्याची मागणी कायम
शरद पवारांनी साधला अभिजित दिपकेंसोबत संवाद; धर्मेंद्र प्रधानांकडून राजीनाम्याची मागणी कायम
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शरद पवार यांनी आंदोलक नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाने आता तीव्र राजकीय रूप धारण केले आहे. सोमवारी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर दिल्लीतील वातावरण कमालीचे तापले असून विरोधी पक्षांचे प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी जंतर-मंतर आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांच्याशी सविस्तर चर्चा केली. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील ३० हून अधिक जिल्ह्यांत या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटल्याचे सांगत आंदोलकांना नेमकी काय मदत हवी आहे आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असणार आहे, याबाबत चौकशी केली.
या भेटीदरम्यान अभिजित दिपके यांनी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. दिल्ली आणि मुंबईत आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या. याशिवाय सोनम वांगचुक यांना तातडीने सोडण्यात यावे आणि देशाभरातील आंदोलकांवरील एफआयआर रद्द करण्यात यावेत, अशी मागणीही दिपके यांनी केली. गेल्या ३१ दिवसांपासून शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनावर सरकारने लाठीचार्ज केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, या आंदोलनाला संपूर्ण विरोधी पक्षांकडून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. ठाकरे गट आणि मनसेनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. एकीकडे शरद पवार यांनी जंतर-मंतरवर जाऊन भेट घेतली असताना, दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाबाहेर जोरदार धरणे आंदोलन केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही जंतर-मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली होती. विरोधी पक्ष या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याने राजधानीतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.
