- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मुंबईत २३ जुलैपासून कलम १४४ लागू; २ आठवडे पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर बंदी
मुंबईत २३ जुलैपासून कलम १४४ लागू; २ आठवडे पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर बंदी
मुंबई:
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात सुरक्षेच्या कारणास्तव २३ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून, कलम १४४ अंतर्गत पाच किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येण्यावर सक्त मनाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी सोमवारी (२० जुलै) महाराष्ट्र पोलीस कायद्यातील विशेष अधिकारांचा वापर करत हे महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्यास, घोषणाबाजी करण्यास आणि ध्वनीक्षेपकांच्या (लाउडस्पीकर) वापरावर पूर्णपणे बंदी असणार आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरात कोणताही अनचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पूर्वखबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रतिबंधात्मक आदेशांनुसार मुंबईत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर सभा घेणे, निदर्शने करणे किंवा मोर्चे काढणे यावर कडक निर्बंध असतील. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मात्र, या आदेशामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर, शाळा-कॉलेज, सरकारी व खाजगी कार्यालये तसेच लोकल ट्रेन आणि बस वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. या सर्व अत्यावश्यक सेवा नियमितपणे आणि पूर्ववत सुरू राहणार आहेत.
त्याचप्रमाणे, लग्नसमारंभ, अंत्यसंस्कार, सिनेमा गृह किंवा इतर नियोजित व्यावसायिक कार्यक्रमांना या आदेशातून काही अटींनुसार सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करून शहरात शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
