- Hindi News
- देश
- जंतर-मंतर लाठीचार्जप्रकरणी चंद्रशेखर आझाद आक्रमक; संसदेत बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलन
जंतर-मंतर लाठीचार्जप्रकरणी चंद्रशेखर आझाद आक्रमक; संसदेत बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलन
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संसद भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात संसद भवनाकडे मोर्चा काढणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ भीम आर्मीचे संस्थापक तथा खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संसद भवन परिसरात थेट बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसातही चंद्रशेखर आझाद यांनी संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बसून ठिय्या मांडला आहे. जंतर-मंतरवर लहान मुला-मुलींवर आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या या कारवाईची तुलना त्यांनी थेट ऐतिहासिक 'जालियनवाला बाग' दुर्घटनेशी करत केंद्र सरकारवर आणि पोलिसांच्या कारवाईवर जोरदार प्रहार केला आहे.
सोमवारी आंदोलक विद्यार्थ्यांनी संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात मोठे बॅरिकेड्स लावून त्यांना रोखले. या दरम्यान झालेल्या संघर्षात पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केल्याने अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे. या घटनेवर अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना खासदार चंद्रशेखर आझाद म्हणाले की, लोकशाहीत शांततेच्या मार्गाने आपले मत मांडणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. हा अधिकार जर बळाचा वापर करून दडपला जात असेल, तर हा केवळ विद्यार्थ्यांवर नाही तर थेट लोकशाहीच्या मूल्यांवर झालेला हल्ला आहे. आजच्या दृश्यांनी इतिहासातील काळ्या अध्यायाची आठवण करून दिली असल्याचे त्यांनी नमूद केले.
जोपर्यंत या अमानुष लाठीमारासाठी जबाबदार असलेल्या पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार संवादातून तोडगा काढत नाही, तोपर्यंत हा शांततापूर्ण लोकशाही संघर्ष संसद भवनातून असाच सुरू राहील, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि भर पावसात सुरू असलेल्या आंदोलनामुळे सरकारवर आणि प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
