- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- उद्या मुंबईत ठाकरे बंधूंचा 'संयुक्त तिरंगा मोर्चा'; राज ठाकरेंच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
उद्या मुंबईत ठाकरे बंधूंचा 'संयुक्त तिरंगा मोर्चा'; राज ठाकरेंच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
NEET परीक्षा घोटाळ्याविरोधात २६ जुलैला मुंबईत ठाकरे बंधूंचा 'संयुक्त तिरंगा मोर्चा'! शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत निघणाऱ्या मोर्च्याबाबत राज ठाकरेंची कडक पोस्ट.
मुंबई: नीट (NEET) परीक्षा घोटाळा आणि विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात उद्या (२६ जुलै) मुंबईत ठाकरे बंधूंच्या वतीने भव्य 'संयुक्त तिरंगा मोर्चा' काढण्यात येणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत निघणाऱ्या या मोर्च्याची जय्यत तयारी सुरू असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून आपल्या कार्यकर्त्यांना मोर्चीच्या शिस्तीबाबत आणि सुरक्षेबाबत कडक सूचना दिल्या आहेत. मोर्च्यादरम्यान कोणीही हुलदडबाजी करण्याचा किंवा महिला-मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना थेट पोलिसांच्या स्वाधीन करावे, आणि प्रसंगी आपल्या मनगटातील शक्तीचा वापर कसा करायचा हे आपल्याला चांगले ठाऊक आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, हा 'तिरंगा मार्च' पूर्णपणे अराजकीय असून यात कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा नेत्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जाणार नाहीत. हा मोर्चा केवळ देशभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या पाठिर्साठी आहे. मात्र, मोर्च्यात काही उत्साही लोक येऊन वातावरण बिघडवण्याचा किंवा पालकांना व विशेषतः महिला आणि मुलींना छेडण्याचा प्रयत्न करू शकतात, अशा समाजकंटकांना हुडकून काढण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जवळ पोलीस असतील तर अशा विकृत व्यक्तींना 'समारंभपूर्वक' पोलिसांच्या ताब्यात द्यावे, आणि पोलीस नसतील तिथे त्यांचा 'पाहुणचार' कसा करायचा याचा पुरेसा अनुभव आपल्याकडे असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे बजावले आहे.
या मोर्च्याला कोणतीही राजकीय किनार नसून हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लढा असल्याचे नमूद करत राज ठाकरेंनी सर्व महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मोर्च्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व पालकांची पूर्ण काळजी घेऊन त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. उद्या सकाळी १० वाजता शिवाजी पार्कवरून सुरू होणाऱ्या या शांततापूर्ण आणि महामोर्च्याच्या माध्यमातून दिल्लीतील सरकारला जनतेच्या संतापाची जाणीव करून दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
