- Hindi News
- पुणे
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे मलमपट्टी"; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रकाश आंबेडकरांचे स्प...
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे मलमपट्टी"; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रकाश आंबेडकरांचे स्पष्ट मत
NEET पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य! राजीनाम्यात आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांबद्दल संवेदना नसल्याचा गंभीर आरोप.
पुणे: देशभर गाजलेल्या नीट (NEET) परीक्षा प्रश्नपत्रिका लीक प्रकरण आणि दिल्लीतील जंतर-मंतरवरील तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या राजीनाम्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. पुणे येथे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, शिक्षणमंत्र्यांनी दिलेला हा राजीनामा नसून तो केवळ मलमपट्टी करण्याचा प्रयत्न आहे आणि या कृतीमुळे उलट आगीत तेल ओतण्याचेच काम झाले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि शिक्षणमंत्र्यांच्या भूमिकेचा कडाडून विरोध केला. ते म्हणाले की, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिलेला राजीनामा हा पंतप्रधानांनी त्यांच्याकडे मागितला होता, असा स्पष्ट उल्लेख टाळत तो त्यांनी स्वेच्छेने स्वतःहून दिल्यासारखा भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या राजीनामा पत्रात किंवा बडतर्फीच्या घोषणेत देशातील शिक्षण व्यवस्थेच्या अकर्तृत्वामुळे आणि पेपरफुटीच्या नैराश्यातून ज्या विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, त्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांबद्दल साधी खंत किंवा संवेदनाही व्यक्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा साधा राजीनामा नसून विद्यार्थ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असून यामुळे असंतोष आणखी वाढणार आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, देशातील शिक्षण प्रणालीमधील त्रुटींवर बोट ठेवताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आपला खंबीर पाठिंबा कायम राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
