ममता बॅनर्जींना धक्का? मेघालयात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ सक्रिय

मेघालयात मोठा राजकीय भूकंप! युडीपीचे ९ आणि टीएमसीचे ४ आमदार भाजपच्या संपर्कात. ६० सदस्यीय विधानसभेत भाजपची ताकद १५ वर पोहोचण्याची शक्यता.

शिलाँग: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय राजकारणात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम बंगाल पाठोपाठ आता ईशान्येकडील मेघालय राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत असून, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे (UDP) ९ आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) ४ असे एकूण १३ आमदार भारतीय जनता पक्षाच्या (BJP) संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. जर हे सर्व आमदार पक्षप्रवेश करण्यात यशस्वी ठरले, तर मेघालय विधानसभेत केवळ २ आमदार असलेल्या भाजपची ताकद थेट १५ आमदारांवर पोहोचू शकते, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

       मेघालयच्या ६० सदस्यीय विधानसभेत सध्या भाजपचे अलेक्झांडर लालू हेक आणि सनबोर शुल्लाई हे केवळ दोनच आमदार आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू असून, टीएमसीच्या संभाव्य बंडखोर गटात मेघालयचे माजी मुख्यमंत्री डॉ. मुकुल संगमा यांचेही नाव चर्चेत आल्याने या चर्चांना अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, यातील काही आमदारांनी अलीकडेच नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर, पक्षांतराच्या या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा दोन्ही बाजूंनी करण्यात आलेली नाही.

        मेघालयात सध्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या (NPP) नेतृत्वाखालील 'मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्स' (MDA) सरकार कार्यरत असून, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP) या सरकारचा प्रमुख घटक पक्ष आहे. परंतु, सप्टेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळ फेरबदला नंतर UDP मध्ये अंतर्गत नाराजी आणि मतभेद वाढल्याचे बोलले जात आहे. पर्यटनमंत्री पॉल लिंगदोह यांच्या जागी पक्षाध्यक्ष मेटबाह लिंगदोह यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्यापासून पक्षात गटबाजी उफाळून आली आहे. आगामी २०२८ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अंतर्गत खदखद पक्षासाठी चिंतेची ठरत आहे. दुसरीकडे, पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पक्षात फूट पडल्यास आणि पक्षांतरविरोधी कायद्याच्या (Anti-Defection Law) निकषांनुसार आवश्यक संख्याबळ गोळा झाल्यास बंडखोर आमदारांना रोखणे कठीण होईल.

        मेघालय भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानेही यासंदर्भात आमदारांशी अनौपचारिक चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. राज्य भाजपकडून युडीपीच्या नाराज आमदारांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आल्याची चर्चा असून, काही आमदार थेट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अंतिम निर्णय होईपर्यंत आणि अधिकृत पक्षप्रवेशाची घोषणा होईपर्यंत यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, अशी सावध भूमिका भाजप नेत्यांकडून घेतली जात आहे. जर खरोखरच १३ आमदार भाजपच्या गळाला लागले, तर मेघालयातील सत्तेची समिकरणे पूर्णपणे बदलू शकतात आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला ईशान्य भारतात आणखी एक मोठा राजकीय फटका बसू शकतो. सध्या या संभाव्य राजकीय भूकंपाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

ममता बॅनर्जींना धक्का? मेघालयात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ सक्रिय

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software