पालकांना गुन्ह्यातून वाचवण्याच्या नावाखाली लाच मागणी; सोलापुरात खळबळ

सोलापुरात आई-वडिलांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ५.५ लाखांची लाच मागणारे दोघे एसीबीच्या जाळ्यात. माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

सोलापूर: आई-वडिलांना एका गंभीर गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि त्यांच्या विरुद्धची कायदेशीर कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात ५ लाख ५० हजार रुपयांची लाच उकळणाऱ्या दोन खासगी व्यक्तींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पुणे पथकाने केलेल्या धडक कारवाईत ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील शासकीय व पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या भूमिकेमुळे भ्रष्ट घटकांचे धाबे दणाणले आहेत.

     तक्रारदाराने २१ ऑगस्ट रोजी लाच मागितल्या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या प्राथमिक पडताळणी दरम्यान आबा वळकुंदे या संशयिताने तक्रारदाराच्या कामासाठी पोलीस हवालदार अनिल शिंदे व डीवायएसपी वाळके यांच्या नावाखाली तब्बल २५ लाख रुपयांची मोठी मागणी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पडताळणी करण्यात आली असता, तक्रारदाराच्या आई-वडिलांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी डीवायएसपी वाळके यांच्यासाठी ५ लाख रुपये आणि पोलीस हवालदार वाघ यांच्यासाठी ५० हजार रुपये, अशी एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचे निष्पन्न झाले.

      या पुराव्यांच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने २८ ऑगस्ट रोजी सापळा रचण्याचे नियोजन केले आणि २९ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आबा वळकुंदे आणि महादेव माने या दोन्ही खासगी व्यक्तींना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी सोलापूर ग्रामीण भागातील माळशिरस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७, ७अ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदविण्याची कायदेशीर प्रक्रिया जोमाने सुरू आहे. या रॅकेटमध्ये नेमके कोणकोण अधिकारी किंवा कर्मचारी सामील आहेत, याचा सखोल तपास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे. शासकीय कामाच्या बदल्यात किंवा विनाकारण त्रास न देण्यासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

व्यासपीठ शुद्धीकरण प्रकरणावरून राहुल गांधींचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software