- Hindi News
- देश
- दिल्लीतील नीट आंदोलनावरून राजकीय वाद; राहुल गांधींचे अमित शाहांवर गंभीर आरोप
दिल्लीतील नीट आंदोलनावरून राजकीय वाद; राहुल गांधींचे अमित शाहांवर गंभीर आरोप
दिल्लीतील NEET आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर राहुल गांधींचा गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट हल्लाबोल. राजीनाम्याची मागणी करत केले खळबळजनक दावे.
नवी दिल्ली:देशाची राजधानी दिल्लीमध्ये ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून देशाच्या राजकारणात मोठा गदारोळ उडाला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका विशेष पत्रकार परिषदेत बोलताना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये महिलांना आणि अल्पवयीन मुलींना देखील लक्ष्य करण्यात आले, असा दावा करत राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीत मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये देशभारतले अनेक तरुण व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यादरम्यान काही आंदोलक विद्यार्थ्यांनी सुरक्षा व्यवस्था व बॅरिकेट्स भेदून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि बळाचा वापर केला. या झालेल्या संघर्षामध्ये काही पोलीस कर्मचारी आणि अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. याच संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारविरोधात रणशिंग फुंकले.
“मी त्यांना स्वतः आदेश देताना पाहिलंय” - राहुल गांधींचा दावा:
पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, "दिल्लीतील या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अत्यंत निष्ठूरपणे महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर लाठीमार केला. या सगळ्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना माहिती नाही का? उलट, अमित शाह यांनीच पोलिसांना या कारवाईसाठी थेट आदेश दिले होते, मी त्यांना स्वतः फोनवर बोलताना आणि आदेश देताना पाहिले आहे," असा अत्यंत खळबळजनक दावा त्यांनी केला. या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
