- Hindi News
- पुणे
- पुणे-बंगळूर रेल्वे प्रवासाला नवी गती; वंदे भारत स्लीपरची चाचणी लवकरच
पुणे-बंगळूर रेल्वे प्रवासाला नवी गती; वंदे भारत स्लीपरची चाचणी लवकरच
मुंबई-बंगळूर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस लवकरच पुणे व सोलापूरमार्गे धावणार. १३० किमी/तास वेगाने चाचणी होणार; प्रवासाचा वेळ तब्बल ५ तासांनी कमी होणार.
पुणे: पुणे आणि सोलापूर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’ एक्सप्रेसच्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, ही हाय-स्पीड ट्रेन लवकरच पुणे आणि सोलापूरमार्गे धावणार आहे. या रेल्वेचे दोन रेक नुकतेच बंगळूरमध्ये दाखल झाले असून, आगामी एक ते दोन आठवड्यांत या मार्गावर १३० किलोमीटर प्रति तास या वेगाने वेगचाचणी (Speed Trial) घेण्यात येणार आहे. ही महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ठरणार असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ही रेल्वे नेमकी कोणत्या मार्गावरून धावणार, याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मिरजमार्गे ही गाडी जाईल अशी चर्चा होती, परंतु रेल्वे बोर्डाने तांत्रिक बाबींचा विचार करता हा मार्ग १३० किलोमीटर वेगासाठी सक्षम नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने अधिकृतपणे ही गाडी कलबुर्गी, सोलापूर आणि पुणे मार्गेच धावणार असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयामुळे पुणे आणि सोलापूरसह महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गावर धावणाऱ्या उद्यान एक्सप्रेसला पुणे ते बंगळूर हे अंतर कापण्यासाठी सुमारे १८ तास १५ मिनिटांचा वेळ लागतो, मात्र वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसमुळे हेच अंतर आता केवळ १३ तासांत पार होणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही रेल्वे आठवड्यातून सहा दिवस धावणार असून, एका दिवशी देखभालीसाठी (Maintenance) राखीव ठेवण्यात येणार आहे. वंदे भारत स्लीपर एक्सप्रेससाठी दोन रेकचा वापर केला जाणार असून, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुंबई व बंगळूर येथून ही गाडी प्रस्थान करणार आहे. मुंबई ते बंगळूर दरम्यानचा एकूण प्रवासाचा वेळ १६ तासांचा असणार आहे, तर पुण्यावरून बंगळूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा प्रवास अवघ्या १३ तासांत पूर्ण होणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांच्या तुलनेत हा वेळ खूपच कमी असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. लवकरच ही रेल्वे पूर्ण क्षमतेने प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याने रेल्वे प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण केली जात आहे.
