- Hindi News
- सातारा
- बोरगाव परिसरात केबल चोरांचा सुळसुळाट; शेतातील विद्युत केबल चोरीने शेतकरी त्रस्त
बोरगाव परिसरात केबल चोरांचा सुळसुळाट; शेतातील विद्युत केबल चोरीने शेतकरी त्रस्त
साताऱ्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ. ऐन हंगामात सिंचन कोलमडल्याने शेतकरी त्रस्त.
सातारा: सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ग्रामीण भागात सध्या अज्ञात् चोरांनी उच्छाद मांडला असून, शेतशिवारातील विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. या परिसरातील खोजेवाडी, आंबेवाडी, निसराळे आणि मत्त्यापूर या गावांच्या शेतशिवारांना चोरट्यांनी वारंवार लक्ष केले असून, यामुळे बळीराजाच्या चिंतेत आणि संतापात मोठी भर पडली आहे. ऐन शेतीच्या मोसमात आणि पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना केबल चोरीच्या घटना घडत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या गस्तीवर आणि कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
या परिसरातील चोरट्यांचा उपद्रव इतका वाढला आहे की, अनेक शेतकऱ्यांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही दुर्दैवी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपांच्या केबलची एकाच हंगामात एकदा नव्हे तर तब्बल दोन-दोन वेळा चोरी झाल्याचे समोर आले आहे. पिकांना पाणी देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐन हंगामाच्या वेळेस वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचन पूर्णपणे कोलमडत आहे. आधीच विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन केबल खरेदी करण्यासाठी स्वतःच्या खिशातून हजारो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण शेतीचा खर्च वाढून आर्थिक गणित कोलमडत चालले आहे.
रात्रीच्या वेळी निर्जन शेतशिवारात सक्रिय होणाऱ्या या चोरट्यांच्या टोळ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या अंधारात मोटारींची राखण करण्यासाठी जाणे शेतकऱ्यांच्या जीवावर बेतणारे ठरत आहे. वारंवार तक्रारी देऊनही या चोरांचा सुळसुळाट कमी होत नसल्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून विचारला जात आहे. त्यामुळे बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळेस प्रभावी गस्त वाढवून या केबल चोरांच्या मुसक्या आवळाव्यात आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
