- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- तरुणांच्या नव्या विचारांनी प्रशासनाला बळ; मुख्यमंत्री फेलोशिपला फडणवीसांचे प्रोत्साहन
तरुणांच्या नव्या विचारांनी प्रशासनाला बळ; मुख्यमंत्री फेलोशिपला फडणवीसांचे प्रोत्साहन
मुंबईत 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६' सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासन आणि IIT मुंबई यांच्यात महत्त्वपूर्ण MoU.
मुंबई: प्रशासन आणि शासन व्यवस्थेत युवकांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञानाची जोड आणि नव्या पिढीचा दृष्टिकोन समाविष्ट केल्यास विकासाला गती मिळू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्यादिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६’ अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि नवीन बॅचच्या आरंभ सोहळ्यात ते बोलत होते. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या निर्मितीत तरुण पिढीची भूमिका निर्णायक असून, फेलोंनी या फेलोशिपच्या अनुभवातून आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक परिवर्तनाचे दूत बनून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अर्थ व सांख्यिकी आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, आयआयटीचे प्राध्यापक, तसेच फेलोशिप कार्यक्रमाचे समन्वयक आणि मोठ्या संख्येने सीएम फेरोज उपस्थित होते. शासनामध्ये अनुभवी आणि गुणवत्तापूर्ण अधिकारी असले तरी दीर्घकाळ एकाच कार्यपद्धतीत काम करताना कल्पकता आणि प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलचा संपर्क काही प्रमाणात कमी होऊ शकतो, अशी खंत व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रशासनात नवे विचार रुजवण्यासाठी आणि त्याचवेळी तरुणांना शासकीय कार्यपद्धती जवळून समजून घेण्याची संधी देण्यासाठी हा फेलोशिप कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. फेलोशिप हा केवळ एकतर्फी अनुभव नसून, फेलोंच्या माध्यमातून प्रशासनालाही नवनवीन कल्पना आणि आधुनिक दृष्टिकोन मिळतो, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
मागील बॅचमधील सीएम फेलोंनी स्टार्टअप धोरण, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, जिल्हास्तरीय वॉर रूम्स, विविध डिजिटल डॅशबोर्ड, जलयुक्त शिवाराचे जीआयएस मॅपिंग, ‘मागेल त्याला शेततळे’, ई-गव्हर्नन्स, प्रभावी तक्रार निवारण व्यवस्था, चॅटबॉट्स तसेच ‘महाराष्ट्र युनिक इन्फ्रा आयडी’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान दिल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. प्रशासनात बदलासाठी केवळ शासन निर्णयाची (GR) प्रतीक्षा न करता, लोकाभिमुख आणि सोपी कार्यसंस्कृती आधी स्वतःपासून राबवण्याची नवी पद्धत विकसित झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शासनाच्या १०० आणि १५० दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतही फेलोंने आवास योजना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, लखपती दीदी उपक्रम, तसेच आदिवासी भागातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कामांत उत्कृष्ट भूमिका बजावली आहे.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी फेलोंना प्रशासकीय धोरणांची अंमलबजावणी करताना थेट क्षेत्रीय पातळीवर जाऊन काम करण्याचे आवाहन केले. कागदी कागदपत्रांपेक्षा प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे आणि तळागाळातील समस्या समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक फेलोने आपल्यातील आवड आणि कौशल्या नुसार विषय निवडून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिका आयुक्तांसोबत काम करत प्रशासनाला अधिक व्यवहार्य आणि उपयुक्त अभिप्राय द्यावा, असे प्रातिनिधिक मार्गदर्शन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सन २०२६-२७ पासून सुरू होणाऱ्या ‘पोस्ट ग्रज्युएट सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड पब्लिक पॉलिसी’ या विशेष पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबईच्या वतीने प्राध्यापक बकुळ राव यांच्यात अधिकृत सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अर्थ व सांख्यिकी आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी फेलोशिपच्या संपूर्ण प्रवासाची माहिती दिली. नवीन बॅचने मागील सर्व रेकॉर्ड मोडून अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा शुभेच्छा देत या प्रेरणादायी सोहळ्याची सांगता झाली.
