- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- स्वातंत्र्यदिनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे इन्स्टाग्राम खाते बंद
स्वातंत्र्यदिनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे इन्स्टाग्राम खाते बंद
NEET आंदोलनातील छायाचित्र पोस्ट केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) इन्स्टाग्राम हँडल ब्लॉक. संस्थापक अभिजीत दीपके यांची तीव्र प्रतिक्रिया.
नवी दिल्ली:देशभरात ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांना १५ ऑगस्टच्या सकाळीच एक मोठा धक्का बसला. CJP चे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट अचानक ब्लॉक करण्यात आल्यामुळे संतापलेल्या दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वरून तीव्र शब्दांत आपला निषेध नोंदवला आहे. पेज ब्लॉक करणाऱ्यांवर निशाणा साधत त्यांनी थेट “किती मोठे भित्रे आहेत!” असे म्हणत आपला तीव्र रोष व्यक्त केला आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना अभिजीत दीपके यांनी एका अत्यंत संवेदनशील छायाचित्राची निवड केली होती. नीट (NEET) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे छायाचित्र त्यांनी ‘एक्स’वर शेअर केले. “स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. हा फोटो आपल्यासाठी एक आठवण आहे की आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे,” असा संदेश त्यांनी या पोस्टमधून दिला होता. या पोस्टनंतर अवघ्या काही तासांतच CJP चे अधिकृत इंस्टाग्राम हँडल बॅन किंवा ब्लॉक करण्यात आल्याचे समोर आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या दीपके यांनी इन्स्टाग्राम पेजचा स्क्रीनशॉट शेअर करत प्रशासकीय किंवा विरोधकांच्या मानसिकतेवर ताशेरे ओढले आहेत.
भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यानंतर त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी अभिजीत दीपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना केली होती. अल्पावधीतच या पक्षाने आणि त्याच्या सोशल मीडिया पेजेसनी तरुणांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली. त्यानंतर अमेरिकेवरून थेट भारतात परतत दीपके यांनी नीट पेपर लीक विरोधात दिल्लीतील जंतर मंतर वर ऐतिहासिक आंदोलन उभारले. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला, ज्याचा परिणाम म्हणून अखेर शिक्षणमंत्र्यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता.
दिल्लीतील जंतर मंतर वरील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता अभिजीत दीपके यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि शिक्षणव्यवस्थेच्या सुधारणेकडे वळवला आहे. आंदोलनाचा फोकस केवळ नीट पुरता मर्यादित न ठेवता देशातील शैक्षणिक अस्वच्छता दूर करण्यासाठी CJP कडून ‘स्कूल ठीक करो’ हे नवे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या अभियानाची सुरुवात खुद्द अभिजीत दीपके यांच्या महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील मूळ गावातून होणार आहे.
या अभियानांतर्गत विशेष टीम तयार करण्यात आली असून, त्या गावागावांत जाऊन सरपंचांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. सरकारी शाळांची तातडीने दुरुस्ती करणे, शाळेत बसण्यासाठी बाके, पिण्याचे शुद्ध पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीतील उच्चस्तरीय आंदोलनानंतर आता थेट ग्रामीण भागातील शाळांच्या दुरस्तीसाठी CJP ने पुढाकार घेतल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले आहे.
