- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- महाराष्ट्र लोकायुक्तात दोन न्यायिक, दोन बिगर न्यायिक सदस्यांचा शपथविधी
महाराष्ट्र लोकायुक्तात दोन न्यायिक, दोन बिगर न्यायिक सदस्यांचा शपथविधी
महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या दोन न्यायिक व दोन बिगर-न्यायिक सदस्यांचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शपथविधी. रश्मी शुक्ला व न्यायमूर्ती तावडे यांचा समावेश.
मुंबई: २०२३ च्या नव्या लोकायुक्त कायद्यानुसार पुनर्रचित आणि विस्तारित करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या कामकाजाला आता अधिकृत गती मिळणार असून, संस्थेवरील दोन न्यायिक सदस्यांचा आणि दोन बिगर-न्यायिक सदस्यांचा अत्यंत दिमाखदार शपथ विधी सोहळा मुंबईतील लोकभवन येथे पार पडला. राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सर्व नवीन सदस्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. या महत्त्वाच्या नियुक्त्यांमुळे राज्यातील शासकीय पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा अधिक मजबूत होणार आहे.
या शपथविधी सोहळ्यात सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांना महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या पहिल्या न्यायिक सदस्य पदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर, निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश सुवर्णा किशोर केवले यांनी संस्थेच्या दुसऱ्या न्यायिक सदस्य पदाची शपथ घेतली. याचबरोबर प्रशासकीय व सुरक्षा यंत्रणेचा दांडगा अनुभव असलेले सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता आणि राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी लोकायुक्त संस्थेचे बिगर-न्यायिक सदस्य म्हणून शपथ ग्रहण केली. शासनाच्या नियमा नुसार या सर्व सदस्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करतील, यापैकी जी मुदत आधी येईल त्यापर्यंत असणार आहे.
लोकभवन येथे पार पडलेल्या या उच्चस्तरीय सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी व प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ‘वंदे मातरम्’च्या गजरात झाली. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सुरुवातीला सर्व सदस्यांच्या महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेवरील नियुक्तीची अधिकृत शासनाची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर राज्यपालांच्या सूचनेनुसार सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व नियुक्त सदस्यांना त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना सुपूर्द केली. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता करण्यात आली असून, या नव्या नियुक्त्यांमुळे महाराष्ट्रातील लोकशाही व प्रशासकीय उत्तरदायित्व अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
