- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- अवयवदानाला गती देण्यासाठी प्रक्रिया सुलभ करा; प्रकाश आबिटकरांचे आदेश
अवयवदानाला गती देण्यासाठी प्रक्रिया सुलभ करा; प्रकाश आबिटकरांचे आदेश
महाराष्ट्रात अवयवदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश. ४ नवीन केंद्रे, कॉर्पस फंड आणि खाजगी रुग्णालयांना सक्त ताकीद.
मुंबई: अवयवदान आणि प्रत्यारोपण (Organ Donation & Transplantation) प्रक्रियेतील कायदेशीर व तांत्रिक किचकटपणा दूर करून ‘रोटो-सोटो’ची (ROTTO-SOTTO) कार्यप्रणाली अधिक गतिमान करण्याचे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. अवयवदानाची नोंदणी प्रक्रिया वाढवण्यावर भर देतानाच, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अवयवदानाबाबत समाजात असलेली भीती आणि निरुत्साह दूर करण्यासाठी सर्व रुग्णालयांनी पुढाकार घेऊन प्रभावी जनजागृती अभियान राबवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवयवदान दिन’निमित्त विशेष जनजागृती आणि रुग्णालयांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविन्द्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य आयुक्त डॉ. सुनील भोकरे, ईएसआयएसचे आयुक्त रमेश चव्हाण, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, तसेच मुंबईतील विविध खासगी रुग्णालयांचे प्रमुख प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसार आणि सुविधांच्या विकेंद्रीकरणावर भर देताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, अवयव प्रत्यारोपणासाठी गरजू रुग्णांना केवळ पुणे किंवा मुंबईवर अवलंबून राहावे लागू नये. यासाठी कोल्हापूर, अमरावती यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नवीन केंद्रे सुरू झाल्यास राज्यभरातील नागरिक व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. प्रस्तावित चार नवीन केंद्रांचे कामकाज पुढील एका महिन्यात मार्गी लावले जावे. तसेच, अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रियेबाबत न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालातील शिफारसी व सूचनांवर पुढील आठवड्यात बैठक घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली की, अवयव प्रत्यारोपणासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणी सार्वजनिक आरोग्य विभागाने यशस्वीपणे दूर केल्या आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून तामिळनाडूच्या धर्तीवर विशेष ‘कॉर्पस फंड’ (Corpus Fund) तयार करण्यात आला असून, याद्वारे गरजू रुग्णांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. खासगी रुग्णालयांनीही या लोक कल्याणकारी उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त रुग्णांना सेवा द्यावी. मात्र, या योजनेच्या निर्धारित पॅकेजव्यतिरिक्त रुग्णालयांनी रुग्कांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून एकही अतिरिक्त रुपया आकारू नये, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली.
अवयवदानासाठी आपली इच्छा व्यक्त करणारे एक लाखांहून अधिक अर्ज भरून महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. अवयवदान करणाऱ्या दात्यांच्या कुटुंबीयांचा उचित सन्मान करून समाजात एक सकारात्मक आणि सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. अवयवदानाची प्रक्रिया अतिशय संवेदनशील असल्याने संबंधित यंत्रणांनी संवेदनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगून रुग्णांच्या नातेवाईकांना तातडीने मदत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात बोलताना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी प्रत्येकाने सामाजिक कामातून आनंद मिळवण्याचे आवाहन केले. समाजातील अनेक गरीब रुग्णांना शासन, सामाजिक संघटना आणि खासगी रुग्णालयांची साथ मिळाल्यास त्यांचा पुनर्जन्म होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविन्द्रन यांनी महाविद्यालयांमध्ये व विविध स्तरांवर अवयवदानाचे शिबिरे राबवून जनजागृती वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली. माजी संचालक प्रवीण शिंगारे यांनी कायद्याची सविस्तर माहिती दिली, तर अण्णासाहेब चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्यात काही रुग्णांच्या नातेवाईकांनी मनोगत व्यक्त करत शासनाच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
