भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चौघांना जबाबदारी

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. विनोद तावडे, भारती पवार, पियुष गोयल आणि स्मृती इराणींना महत्त्वाची पदे.

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेल्या या नवीन कार्यकारिणीत देशभरातील अनेक दिग्गजांना सामावून घेण्यात आले असून, यामध्ये महाराष्ट्रातील चार प्रमुख नेत्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. तसेच, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे राष्ट्रीय पातळीवर जोरदार कमबॅक झाले असून त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

        भाजपच्या या नव्या राष्ट्रीय संघटन रचनेत महाराष्ट्राला विशेष आणि वजनदार प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यानुसार, माजी खासदार डॉ. भारती पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, राष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या भूमिकेला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते तथा खासदार विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे असलेल्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारीही कायम ठेवली असून, मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंगठन मंत्रीपदी फेरनिवड झाली आहे. याशिवाय, सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून प्रिती गांधी यांनाही या कार्यकारिणीत सामावून घेण्यात आले आहे.

         या नवीन कार्यकारिणीची व्याप्ती मोठी असून, यात तब्बल १३ राष्ट्रीय उपाध्यक्षांचा समावेश करण्यात आला आहे. राजस्थानच्या पूर्व मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागली असून, राजस्थानचे खासदार सतीश पूनिया यांना राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी राजकीय घडामोडी आणि संभाव्य फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या संघटनात्मक बदलांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले असून, देशातील विविध राज्यांना योग्य प्रतिनिधित्व देत पक्षाने आगामी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील नेत्यांच्या या नियुक्त्यांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

विनोद तावडेंना भाजपकडून मोठी जबाबदारी; यूपी निवडणुकीची धुरा

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software