केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी

पुण्यातील केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला 'दिवंगत अजितदादा पवार उड्डाणपूल' नाव देण्याची रोहन सुरवसे-पाटील यांची मागणी. सुनेत्रा पवार यांना दिले निवेदन.

पुणे: पुणेकरांच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नुकताच नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या बहुचर्चित केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्याबाबतची महत्त्वपूर्ण मागणी पुढे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी यासंदर्भात पुढाकार घेत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना अधिकृत निवेदन सादर केले असून, पुण्याच्या विकासात अमूल्य योगदान देणाऱ्या अजित दादांच्या कार्याचा गौरव म्हणून या पुलाचे नामकरण ‘दिवंगत अजितदादा पवार उड्डाणपूल’ असे करावे, अशी आग्रही मागणी केली आहे.

        पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आणि परिसरातील दळणवळण अधिक सुटसुटीत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या नव्या उड्डाण पुलाचे उद्घाटन नुकतेच (रविवार, १६ ऑगस्ट) मुंडवा येथील गोदरेज इन्फिनिटी जवळ केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. उद्घाटना नंतर हा मार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासात आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारात अजितदादा पवार यांनी घेतलेला पुढाकार आणि राबवलेले प्रकल्प ऐतिहासिक आहेत. त्यांच्या याच विकासाभिमुख कार्याची प्रचिती कायम राहावी, या उद्देशाने या पुलाला त्यांचे नाव देण्याची विनंती करण्यात आली आहे.

       केशवनगर आणि खराडी परिसराचा ताण कमी करणाऱ्या या प्रकल्पाची लांबी सुमारे ४११.४० मीटर असून रुंदी २४ मीटर इतकी आहे. या पुलावर एकूण सात गाळे असून प्रत्येक गाळ्याची लांबी ३५.२ मीटर आहे. खराडी बाजूकडील अप्रोच रस्ता ४० मीटर तर केशवनगर बाजूकडील अप्रोच रस्ता १२५ मीटर लांबीचा आहे. या प्रकल्पाची निविदा रक्कम २३.४७ कोटी रुपये असून आतापर्यंत सुमारे २३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या पुलावरून दुतर्फा वाहनांची वाहतूक सुरू झाल्यामुळे केशवनगर कडून खराडीकडे जाणाऱ्या वाहन चालकांचा तब्बल सहा किलोमीटरचा अतिरिक्त वळसा आता टळणार आहे.

         या प्रकल्पामुळे बायपास रस्त्यावरील प्रचंड ताण कमी होऊन वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांचा सुमारे अर्धा तास वाचणार आहे. वेळेची बचत होण्या बरोबरच इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून, परिसरातील वायू व ध्वनी प्रदूषण कमी होण्यासही या पुलाचा मोलाचा हातभार लागणार आहे. त्यामुळे केशवनगर, खराडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि दर्जेदार वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली असून, या महत्त्वाच्या पुलाला अजितदादांचे नाव दिल्यास ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा विश्वास रोहन सुरवसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

विनोद तावडेंना भाजपकडून मोठी जबाबदारी; यूपी निवडणुकीची धुरा

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software