- Hindi News
- पुणे
- दुधाच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा; एफडीएच्या धडक कारवाईने शुद्ध दुधाला वाढली मागणी
दुधाच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा; एफडीएच्या धडक कारवाईने शुद्ध दुधाला वाढली मागणी
पुणे: शेतीला जोड व्यवसाय म्हणून अहोरात्र कष्ट करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील हजारो दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्याची बाजारपेठ अत्यंत दिलासा दायक ठरत आहे. जनावरांचे वाढते खाद्य, पशुपालनाचा वाढलेला खर्च आणि त्या तुलनेत मिळणारा अत्यंत तोकडा मोबदला यामुळे गेली अनेक वर्षे दुग्ध व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला होता. मात्र, अन्न व औषध प्रशासनाद्वारे (FDA) दुधातील भेसळी विरोधात राज्यभरात राबविण्यात आलेल्या धडक आणि आक्रमक मोहिमेमुळे बाजारातील भेसळयुक्त व असुरक्षित दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर घटला आहे. दुसरीकडे ग्राहकांकडून दुधाची दैनंदिन मागणी कायम असल्याने निर्माण झालेली मागणी आणि पुरवठ्यातीस तफावत थेट दुधाच्या दरांवर सकारात्मक परिणाम करून गेली आहे.
पुणे जिल्ह्यात दुधाचा दर प्रतिलिटर सरासरी ३५ रुपयांवरून थेट ४५ रुपयां पर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना प्रतिलिटर तब्बल १० रुपयांचा अतिरिक्त आणि मोठा आर्थिक फायदा मिळत आहे. यापूर्वी दुधाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील मोठा हिस्सा जनावरांचे महागडे खाद्य, औषधोपचार आणि गोठ्याची देखभाल यांसारख्या नित्याच्या खर्चातच निघून जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात नफा म्हणून अगदी तुटपुंजी रक्कम शिल्लक राहत असे. आता दरामध्ये झालेली ही सुधारणा खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या खिशात काही प्रमाणात अधिक रक्कम टिकवून ठेवणारी ठरत आहे. मुंबईसह राज्यातील इतरही मोठ्या घाऊक बाजारांमध्ये दुधाच्या दरात वाढ झाल्याची चर्चा असून, प्रामाणिकपणे आणि कुठलीही भेसळ न करता दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत सुवर्णसंधी मानली जात आहे.
दुधातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएने दूध संकलन केंद्रे, डेअरी, वाहतूक वाहने, वितरण व्यवस्था तसेच विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर कसून तपासणी मोहीम हाती घेतली आहे. निकृष्ट किंवा भेसळयुक्त दूध तातडीने जप्त करून संबंधितांवर कठोर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जात असल्यामुळे बाजारातील गैरप्रकारांना मोठा आळा बसला आहे. या कडक नियमांमुळे बाजारात उपलब्ध होणाऱ्या दुधाच्या प्रमाणावर तात्पुरता परिणाम झाला असला, तरी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण दुधाला त्याचा योग्य व न्याय्य बाजारभाव मिळत असल्याचे दुग्ध व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सध्याची बाजारातील परिस्थिती पाहता, दुधाची ग्राहकाकडील मागणी अशीच कायम राहिल्यास आणि उत्पादनाच्या तुलनेत उपलब्धता नियंत्रित राहिल्यास दरवाढीचा हा कल आगामी काळातही टिकून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. योग्य मोबदला मिळाल्यास ग्रामीण भागातील तरुण पुन्हा या व्यवसायाकडे अधिक जोमाने वळतील, असा विश्वास व्यक्त केला जात असून, सध्याच्या या दरवाढीमुळे पुणे जिल्ह्यातील बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
