राहुल गांधींच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; दुष्काळ-शेतकरी मदतीवर भूमिका स्पष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर घणाघात. ५ ऑक्टोबर नंतर पीक पंचनामे करून शेतकऱ्यांना NDRF ची मदत देण्याची घोषणा.

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकेवर अत्यंत तीव्र शब्दांत ताशेरे ओढत, ‘राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी आहे,’ असा घणाघाती हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देशातील जनतेने त्यांचे नेतृत्व पूर्णपणे नाकारले आहे, हे सत्य राहुल गांधी अद्यापही मान्य करायला तयार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. मुंबईत युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या (UWA) पहिल्या भारतीय कॅम्पसच्या उद्घाटनानंतर आयोजित संवादात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या पक्षनाव व चिन्हाबाबत केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. आपला सवयीचा पराभव लपवण्यासाठीच असे दिशाभूल करणारे आरोप केले जात असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

       राज्यभरातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका सविस्तर स्पष्ट केली. राज्य सरकारने दुष्काळाची परिस्थिती अतिशय गांभीर्याने घेतली असून, सध्या प्रभावित भागात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची पुरेशी व्यवस्था करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कर्जमाफीची प्रक्रियाही वेगाने सुरू असून पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळा अधिकृतपणे पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच ५ ऑक्टोबरनंतर प्रत्यक्ष पीक नुकसानीचे पंचनामे हाती घेतले जातील आणि त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठीची प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही देत त्यांनी शरद पवार यांच्या पत्राचे स्वागत केले. या गंभीर आणि संवेदनशील मुद्द्याला कोणताही राजकीय रंग न देता पवार यांच्या कडून आलेल्या रचनात्मक सूचने संदर्भात सरकार नेहमीच सकारात्मक विचार करेल, असेही त्यांनी नमूद केले.

       या दौऱ्यात त्यांनी मुंबईत सुरू झालेल्या युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या (UWA) ऐतिहासिक कॅम्पसच्या उद्घाटनाचा विशेष उल्लेख केला. १८ सप्टेंबर रोजी सुरू झालेला हा कॅम्पस भारतातील कोणत्याही परदेशी विद्यापीठाचा पहिलाच अधिकृत आंतरराष्ट्रीय शाखा कॅम्पस ठरला आहे. आगामी काळात महाराष्ट्रात एकूण सात नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येत असून, यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना देशात आणि घरातच जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. तसेच परकीय चलनाची मोठी बचत होऊन संशोधन, तंत्रज्ञान (STEM) आणि व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक नवी व बलवान चालना मिळेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; किकवीजवळ ट्रकला धडकून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software