- Hindi News
- सातारा
- पोळ विरुद्ध पोळ' अन् भाजप-राष्ट्रवादीत थेट संघर्ष; माणमध्ये प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला!
पोळ विरुद्ध पोळ' अन् भाजप-राष्ट्रवादीत थेट संघर्ष; माणमध्ये प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला!
दहिवडी: माण तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंके यांनी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली असून, अनेक ठिकाणी प्रस्थापित विरुद्ध नवखे तर काही ठिकाणी पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.
राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला
भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस, शिवसेना (शिंदे व ठाकरे गट), रासप, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि आप यांसारख्या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक गटांत थेट लढत होत असली, तरी अपक्ष उमेदवारांच्या मोठ्या संख्येमुळे राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद: गटांत रंगणार 'काटे की टक्कर'
जिल्हा परिषदेच्या ५ गटांमध्ये मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आंधळी गट: येथे भाजपच्या सोनल गोरे आणि राष्ट्रवादीच्या योगिता दडस यांच्यात मुख्य सामना आहे. दीपाली जगदाळे यांच्या अर्जावरील हरकतीने येथे अधिक चर्चा रंगली आहे.
बिदाल गट: भाजपच्या अलका जगदाळे विरुद्ध राष्ट्रवादीच्या (शप) मोनाली विरकर यांच्यात लढत होत असून, रासप आणि महापरिवर्तन आघाडीनेही येथे आव्हान उभे केले आहे.
मार्डी गट: येथे डॉ. भारती पोळ (भाजप) आणि सोनाली पोळ (राष्ट्रवादी) यांच्यात 'पोळ विरुद्ध पोळ' असा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे.
गोंदवले बुद्रुक गट: अनुसूचित जाती महिला राखीव असलेल्या या गटात सावित्री शिलवंत (भाजप) आणि शितल रणपिसे (राष्ट्रवादी) यांच्यात मुकाबला आहे.
कुकुडवाड गट: हा गट सर्वाधिक चुरशीचा ठरण्याची चिन्हे आहेत. येथे भाजपचे अरुण गोरे, राष्ट्रवादीचे अनिल देसाई, काँग्रेसचे महेश करचे आणि शिवसेनेचे सुरेश गोरड यांच्यासह अनेक अपक्ष रिंगणात असल्याने बहुकोनी लढत होणार आहे.
पंचायत समिती: गणांमध्ये उमेदवारांची भाऊगर्दी
पंचायत समितीच्या १० गणांमध्येही मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत.
वावरहिरे गण: येथे सर्वाधिक १३ उमेदवार रिंगणात आहेत. राजाराम बोराटे (भाजप), शामराव राऊत (राष्ट्रवादी) आणि दोन्ही शिवसेना गटांच्या उमेदवारांमुळे ही लढत रंगतदार होईल.
बिदाल गण: येथे भाजपच्या उषा भोसले, राष्ट्रवादीच्या पुष्पलता मगर आणि राष्ट्रवादी (शप) च्या मनिषा इंगळे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
पळशी गण: ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या गणात राजेंद्र खाडे (भाजप) आणि मानसिंग खाडे (राष्ट्रवादी) यांच्यात चुरस आहे.
वर मलवडी गण: आनंदराव खरात (भाजप) आणि विक्रम शिंगाडे (राष्ट्रवादी) यांच्यात प्रमुख लढत असून काँग्रेस व शिवसेनेनेही येथे उमेदवार दिले आहेत.
प्रशासकीय तयारी पूर्ण
निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंके, निवडणूक निरीक्षक सरिता नरके आणि तहसीलदार विकास अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली छाननी प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडली. उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फुटला असून, गावोगावी कोपरा सभा आणि भेटीगाठींना वेग आला आहे.
महत्वाचे मुद्दे :-
प्रमुख लढती: भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (विद्यमान गट)
अपक्ष उमेदवारांचा फॅक्टर: अनेक गणांमध्ये अपक्ष उमेदवार निर्णायक ठरणार.
प्रचाराचा मुख्य मुद्दा: पाणी प्रश्न, विकासकामे आणि स्थानिक नेतृत्व. आता तालुक्यातील जनता कोणाच्या पारड्यात आपले मत टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
