मराठी भाषा संवर्धनासाठी नांदेडमध्ये लवकरच स्थापन होणार ‘जिल्हा मराठी भाषा विकास केंद्र’; मंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नांदेडमध्ये 'जिल्हा मराठी भाषा विकास केंद्र' स्थापन होणार. उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली घोषणा.

नांदेड: मराठी भाषेचे जतन, संवर्धन, विकास आणि तिचा जागतिक स्तरावर व्यापक प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासना कडून विविध महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच मालिकेचा एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात लवकरच जिल्हा मराठी भाषा विकास केंद्र स्थापन केले जाणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी नांदेड येथे केली. या केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रमांचे नियोजन, समन्वय, नियमन आणि नियंत्रण केले जाणार असून, यासाठी एका स्वतंत्र ‘मराठी भाषा अधिकारी’ यांचीही नियुक्ती केली जाणार आहे. या महत्त्वाच्या पावलामुळे नांदेड जिल्ह्यात मराठी भाषेच्या विकासाला अधिक मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक, लेखक आणि मराठी भाषा अभ्यासकां सोबत एक विशेष संवाद बैठक पार पडली. या उच्चस्तरीय बैठकीस आमदार बालाजी कल्याणकर,आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महानगर पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदिप गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्यासह अनेक मान्‍यवर साहित्यिक, लेखक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री डॉ. सामंत यांनी मराठी भाषा संवर्धन, जतन आणि जागतिक स्तरावर तिचा प्रसार करण्यासाठी शासना मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांनी उपस्थित साहित्यिक आणि अभ्यासकांशी मुक्त संवाद साधत त्यांच्याकडून मराठी भाषेच्या विकासाबाबतच्या अपेक्षा, मूल्यवान सूचना व मागण्या जाणून घेतल्या. साहित्यिकांनी मांडलेल्या सर्व सकारात्मक सूचनांवर शासन गांभीर्याने विचार करेल आणि संबंधित प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी बोलताना डॉ. सामंत म्हणाले की, केंद्र शासना कडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा’ प्राप्त होणे ही संपूर्ण महाराष्ट्रा साठी आणि मराठी भाषकां साठी अत्यंत ऐतिहासिक व अभिमानाची बाब ठरली आहे. मराठी भाषेला जागतिक स्तरावर कायम स्वरूपी अधिष्ठान मिळावे, या उदात्त उद्देशाने युनायटेड किंगडम मधील लंडन येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्रा’साठी एक भव्य इमारत खरेदी करण्यात आली आहे. या ऐतिहासिक वास्तूच्या खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागा मार्फत तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून भविष्यात मराठी भाषा शिक्षण, उच्चस्तरीय संशोधन, साहित्य प्रसार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मराठी उपक्रमांना हक्काचे नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील पायाभूत सुविधांवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, ऐरोली (नवी मुंबई) येथे मराठी भाषा विभागाचे नवीन उपकेंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत (MIDC) विहित भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, राजधानी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य आणि अत्याधुनिक ‘मराठी भाषा भवना’चे काम सध्या अत्यंत वेगाने प्रगती पथावर आहे. राज्याच्या प्रत्येक विभागीय स्तरावर तसेच जिल्हास्तरावर स्वतंत्र ‘मराठी भाषा विकास केंद्र’ स्थापन करण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय असून, आगामी काळात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

राज्यातील अमराठी नागरिकांनाही अगदी सहजतेने आणि आत्मविश्वासाने मराठी भाषा शिकता यावी, यासाठी शासनाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमा अंतर्गत आतापर्यंत सुमारे ७० हजार अमराठी नागरिकांना मराठी भाषा विभागा मार्फत मराठी भाषा यशस्वीपणे शिकविण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, अमराठी भाषिकांना मराठी भाषा अधिक सुलभपणे शिकता यावी आणि ही सुविधा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने लवकरच एक विशेष मोबाईल ॲप्लिकेशन (Mobile App) विकसित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच, राज्यातील मराठी साहित्यिकांना अधिक प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांच्या मानधनात व स्वरूपात योग्य ती वाढ केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्य क्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मानले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गोंदवले शाखेत 'प्रधानमंत्री पीक विमा' मार्गदर्शन वर्ग संपन्न; १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन

Latest News

गोंदवले शाखेत 'प्रधानमंत्री पीक विमा' मार्गदर्शन वर्ग संपन्न; १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन गोंदवले शाखेत 'प्रधानमंत्री पीक विमा' मार्गदर्शन वर्ग संपन्न; १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन
​दहिवडी: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गोंदवले शाखेत 'सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना' (PMFBY) खरीप हंगाम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी...
वृक्षसंवर्धनाचा संदेश देत चंदन शिंदे यांच्याकडून मोफत वृक्षरोपांचे वाटप
राज्यात ‘पशुधन विमा योजना’ लागू; पशुपालकांना ८५ टक्क्यांपर्यंत प्रीमियम अनुदान
नामांकित बांधकाम व्यावसायिकाला ८ कोटींच्या खंडणीची मागणी; १० लाखांसह त्रिकूट अटकेत
राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले; पक्षाकडून मोठी जबाबदारी

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software