- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- जंतरमंतर आंदोलना नंतर सीजेपीमध्ये अंतर्गत कलह; अभिजित दीपकेंवर पक्ष पाताचा आरोप, मनीष ब्रह्मभट यांचा...
जंतरमंतर आंदोलना नंतर सीजेपीमध्ये अंतर्गत कलह; अभिजित दीपकेंवर पक्ष पाताचा आरोप, मनीष ब्रह्मभट यांचा ठिय्या आंदोलन
जंतरमंतर आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीमध्ये फूट. पक्षाध्यक्ष अभिजित दीपके यांच्या घरावर मनीष ब्रह्मभट यांचे ठिय्या आंदोलन.
छत्रपती संभाजीनगर: दिल्लीतील जंतरमंतर येथील यशस्वी आंदोलना नंतर 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) मध्ये अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. जंतरमंतर आंदोलनात प्रत्यक्षात घाम गाळलेल्या आणि सहभागी झालेल्या खऱ्या कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना डावलून, पक्षाध्यक्ष अभिजित दीपके हे आपल्या मोजक्या मित्र आणि कुटुंबीयांना प्राधान्य देत असल्याचा गंभीर आरोप सीजेपीचे नेते मनीष ब्रह्मभट यांनी केला आहे. या प्रकारा बद्दल तीव्र संताप व्यक्त करत ब्रह्मभट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अभिजित दीपके यांच्या निवासस्थाना बाहेर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवास स्थानी मागील दोन दिवसांपासून पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी अहमदाबाद येथून मनीष ब्रह्मभट हे देखील संभाजीनगर मध्ये आले होते. मात्र, आपल्याला या बैठकी मध्ये कोणत्याही कारणा शिवाय सहभागी करून घेण्यात आले नाही, असा आक्षेप ब्रह्मभट यांनी घेतला.
याविषयी बोलताना मनीष ब्रह्मभट म्हणाले की, जंतरमंतर येथील आंदोलन हे कोणत्याही एका व्यक्तीचे नसून ते संपूर्ण देशाचे आणि सर्वसामान्यांचे आंदोलन होते. हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर संघटनेची पुढील दिशा काय असावी, हे ठरवण्यासाठी त्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्वच प्रमुख लोकांना सोबत घेणे आवश्यक होते. अभिजित दीपके हा आमचा लहान भावासारखा आहे, परंतु आज आंदोलनातील सहकाऱ्यांना विश्वासात न घेता केवळ आपल्या मित्र-मंडळींना आणि भावांना जवळ केले जात आहे. त्यांना थेट प्रवक्त्या सारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत, जे पक्षाच्या हिताचे नाही.
पक्षांतर्गत लोकशाहीची मूल्ये आणि शिस्त पायदळी तुडवली जात असल्याचा आरोप करत ब्रह्मभट यांनी खंत व्यक्त केली. आपल्याला अभिजित दीपके यांची भेटही घेऊ दिली जात नाही, असा दावा त्यांनी केला. जंतरमंतर आंदोलना नंतरच्या भूमिके वरून आणि पक्ष संघटनेतील या मनमानी कारभारावरून आता पक्षातच दोन गट पडल्याची चर्चा रंगली असून, या ठिय्या आंदोलनामुळे सीजेपी मधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
