- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- बेस्ट कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; मुंबईकरांना बसणार फटका
बेस्ट कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; मुंबईकरांना बसणार फटका
मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचे १८ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू. शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे मुंबईकरांच्या प्रवासावर परिणामाची शक्यता.
मुंबई: मुंबईची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रदीर्घ प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली आजपासून (१८ ऑगस्ट) अनिश्चित काळासाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील ऑपेरा हाऊसजवळील केनेडी ब्रिज येथील बेस्ट वर्कर्स युनियनच्या कार्यालयात हे आंदोलन पुकारण्यात आले असून, यात विद्यमान कर्मचाऱ्यांसह खासगी ठेकेदारांच्या ‘वेट लीज’ बसवरील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारीही सहभागी झाले आहेत.
या आंदोलनात संघटनेकडून अत्यंत महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने २०१६ ते २०२१ आणि २०२१ ते २०२६ या दोन टप्प्यांमधील प्रलंबित वेतन करारांची तात्काळ अंमलबजावणी करणे, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करणे आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतनश्रेणी मिळणे या मागण्यांचा समावेश आहे. तसेच, वेट लीज व्यवस्थे अंतर्गत खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘समान कामासाठी समान वेतन’ या न्यायाने सर्व लाभ मिळावेत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर अंतिम देयके विनाविलंब अदा करावीत आणि बेस्टच्या ढासळत्या आर्थिक स्थितीला सावरण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी त्वरित मंजूर करावा, अशी मागणी युनियनने केली आहे. जोपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा शशांक राव यांनी दिला आहे.
यापूर्वी जून महिन्यातही कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला होता. मात्र, वारंवार आंदोलनाची वेळ येत असल्याने आता सर्वसामान्यांच्या नित्य प्रवासावर मोठा परिणाम होणार आहे. मुंबईतील चाकरमानी, विद्यार्थी आणि मध्यमवर्गीय नागरिक कमी भाड्यात आणि सोयीस्कर प्रवास म्हणून मोठ्या प्रमाणावर बेस्ट बसचा वापर करतात. कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत आंदोलनामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येणार असून, यावर प्रशासन आणि शासन नेमका काय तोडगा काढणार, याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
