- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मराठी-हिंदीच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; दानवेंचा ‘माय मरो, मावशी जगो’ म्हणत मुख्यमंत्र्यांवर निश...
मराठी-हिंदीच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; दानवेंचा ‘माय मरो, मावशी जगो’ म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुख्यमंत्र्यांच्या 'मराठी आई, इतर भाषा मावशी' विधानावर अंबादास दानवेंचा 'माय मरो पण मावशी जगो' म्हणत घणाघात. महाराष्ट्रात भाषेवरून नवा राजकीय वाद.
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमा दरम्यान मराठी भाषेला ‘आई’ आणि इतर भारतीय भाषांना ‘मावशी’ अशी उपमा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भाषेवरून मोठा वाद पेटला आहे. नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या हिंदी दिवस व हिंदी संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हे विधान करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘माय मरो पण मावशी जगो!’ असा अत्यंत खोचक टोला लगावत फडणवीसांना लक्ष्य केले आहे.
नवी मुंबईत पार पडलेल्या या हिंदी संमेलनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या सोहळ्यात मातृभाषेचे महत्त्व सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, मराठी माझी आई असून इतर भारतीय भाषा या माझ्या मावशीसारख्या आहेत, अशी भूमिका मांडली होती. आईचा गौरव करतानाच मावशीचाही सन्मान राखणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मात्र, त्यांच्या या भाषेविषयक उपमेचे पडसाद तात्काळ राजकीय वर्तुळात उमटले असून, विरोधी पक्षांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर जोरदार प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आपल्या शैलीत निशाणा साधला. ‘मराठीत एक अत्यंत समर्पक म्हण आहे, माय मरो पण मावशी जगो..! बरोबर ना फडणवीस साहेब?’, असे म्हणत त्यांनी या विधानातील विसंगतीवर बोट ठेवले. दानवेंच्या या उपरोधिक टीकेमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरून शाब्दिक युद्ध पेटण्याची चिन्हे निर्माण झाली असून, आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, याच संमेलनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील प्रत्येक प्रादेशिक भाषा समृद्ध आणि बलवान करण्यावर भर दिला. देशातील सर्व भाषांचा समान विकास आणि एकमेकांबद्दलचा परस्पर सन्मान अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भाषाविषयक आणि व्याकरणविषयक योगदानाचा विशेष उल्लेख करत शाह यांनी सावरकर हे केवळ थोर स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकच नव्हे, तर त्यांच्या काळातील एक प्रगल्भ भाषाशास्त्रज्ञही होते, असे गौरवोद्गार काढले. एकीकडे सर्व भाषांचा आदर राखण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य नेतृत्वाकडून केले जात असताना, दुसरीकडे ‘आई आणि मावशी’च्या या राजकीय उपमेवरून महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसत आहे.
