- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- रॅपिडो बाईक चालकाने केला तरुणीच्या विनायभंगाचा प्रयत्न; चाकू व ॲसिड स्प्रे ने हल्ला करण्याची दिली धम...
रॅपिडो बाईक चालकाने केला तरुणीच्या विनायभंगाचा प्रयत्न; चाकू व ॲसिड स्प्रे ने हल्ला करण्याची दिली धमकी
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातच कल्याणमधील सिंधीगेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रॅपिडो बाईक चालकाने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची वार्ता आहे. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी आरोपी बाईक चालक सिद्धेश संदीप परदेशी (19) याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला कल्याण न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही घटना 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान कल्याण पश्चिममध्ये घडली. रॅपिडो मोटारसायकल बुक केलेल्या तरुणीचा बाईक चालकाने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर कायदा धाब्यावर बसवून अवैध रित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडो, ओला, उबेर यासारख्या संस्थांना दिलेला तात्पुरता परवाना रद्द का करण्यात येऊ नये?, या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाची 16 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मंत्रालयातील आपल्या दालनात तातडीची बैठक बोलावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणीने जिमला जाण्यासाठी रॅपिड मोटरसायकल बुक केली होती. बाईक चालकाने तिला घराजवळून पिकअप केले. मात्र प्रवासाचा मेसेज आला नसल्याने तरुणीने ओटीपी विचारला. यादरम्यान, सिंधीगेट चौकाच्या दिशेने जात असताना आरोपी बाईकचालक सिद्धेश परदेशी याने बाईक निर्जन भागातील एका पडक्या इमारतीकडे वळवली. तरुणीला आरोपीच्या हालचालींचा संशय आल्याने तिने चालत्या बाईकवरून उडी मारली. यात तरुणीच्या पायाला दुखापत झाली. तरीही आरोपीने तिला अंधारात ओढत नेले व चाकूचा धाक दाखवला. तिला मारण्याची धमकी देऊन तिच्याकडील सोन्याची आणि मोत्याची माळ तसेच एक हजार रुपये रोख हिसकावून घेतले. आरोपीने स्प्रे दाखवत ॲसिड हल्ल्याची धमकी सुद्धा दिली. तरुणीने भीती न बाळगता त्याला जोरदार प्रतिकार केला व त्याच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर तिने आरडाओरडा सुरु केला. आसपासच्या परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले व बाईक चालकाला ताब्यात घेऊन त्याला मारहाण देखील केली व त्यानंतर त्याला महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दिवसेंदिवस घडणाऱ्या अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
