- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- राष्ट्रवादीत नेतृत्वावरून संघर्ष? रुपाली ठोंबरे पाटलांचा तटकरेंवर थेट निशाणा
राष्ट्रवादीत नेतृत्वावरून संघर्ष? रुपाली ठोंबरे पाटलांचा तटकरेंवर थेट निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा सुनील तटकरेंवर थेट हल्ला. प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी करत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला पाठिंबा.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सुनील तटकरे यांनी पक्षाला मजबूत करण्यासाठी स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, असे ते म्हणाल्या. तसेच, पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे होते, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्यासाठी काही बदलांची शिफारस केली असून, प्रदेशाध्यक्ष बदलापासून या बदलाची सुरुवात करण्याची सूचना केल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अनेक मोठे दावे केले आहेत. खुद्द दिवंगत अजित पवार यांची देखील प्रदेशाध्यक्ष बदलण्याची इच्छा होती, असा दावा त्यांनी केला. महापालिका निवडणुकीपूर्वी १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत अजितदादांनी स्वतः प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचे सांगितले होते, असे सांगत ठोंबरे यांनी जगदंबा मातेची शपथ घेऊन हा दावा केला. आता अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी तटकरेंनी स्वतःहून बाजूला व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे.
सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढताना ठोंबरे म्हणाल्या की, तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कार्यकर्त्यांच्या निवडीची पत्रे देतानाही अनावश्यक दिरंगाई केली जायची. अनेकदा सांगूनही कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तटकरे यांच्यासोबत आमचा कोणताही वैयक्तिक वाद नाही, परंतु पक्षहित आणि संघटनात्मक बळकटीसाठी त्यांनी पद सोडावे. या प्रकरणी नेते उमेश पाटील यांनी मांडलेली भूमिका देखील पूर्णपणे वास्तववादी होती, असे समर्थन त्यांनी दिले. जुन्या सहकाऱ्यांनी दादांच्या हयातीत आणि त्यांच्या निधना नंतरही प्रामाणिकपणे उभे राहणे अपेक्षित होते, असे त्या म्हणाल्या.
यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, दादांच्या निधनानंतर या वरिष्ठ नेत्यांनी पवार कुटुंबाच्या म्हणजेच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे होते. सध्या पक्षात सुरू असलेली परिस्थिती पाहता, पक्ष ताब्यात घेण्याची ही कोणतीही लढाई योग्य नाही. सर्वांनी मिळून सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व स्वीकारले असून, सर्वांनी पवार कुटुंबाच्या पाठीशी ताकदीने उभे राहून पक्षाला बळकट केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
