स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे: अजित डोवाल यांचा तरुणांना कानमंत्र

NSA अजित डोवाल यांना पुण्यात अमित शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ प्रदान. तरुणांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्याचे आवाहन.

पुणे: देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ जाहीर झाला असून, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी अजित डोवाल यांना सन्मानचिन्ह, पारंपरिक पुणेरी पगडी, धनादेश आणि ‘गीतारहस्य’ ग्रंथाची प्रत देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी विशेषतः आजच्या Gen-Z तरुणांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या मनोगतात अजित डोवाल यांनी तरुणाईला संबोधित करताना अत्यंत महत्त्वपूर्ण विचार मांडले. ते म्हणाले की, “आजच्या तरुण पिढीने (Gen-Z) स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. स्वातंत्र्य म्हणजे कोणतीही मनमानी करणे किंवा स्वतःला हवे तसे वागण्याचे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे. राष्ट्रहिताच्या विरोधात जाणारा कोणताही मार्ग किंवा कृती कधीही स्वीकारता कामा नये.” देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य ओळखत देशहिताला नेहमी सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि भारताला अधिक सक्षम तसेच शक्तिशाली बनविण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भाषणादरम्यान डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कणखर नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. आज देशात अंतर्गत आणि बाह्य सुरक्षाविषयक आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी एक मजबूत नेतृत्व लाभले आहे, असे त्यांनी नमूद केले. भारताची सातत्याने होणारी वेगाने प्रगती काही विरोधी शक्तींना डोळ्यात खुपत असून, अशा कठीण काळात देशातील प्रत्येक नागरिकाने राजकारणापेक्षा राष्ट्रहितालाच आपले सर्वस्व मानले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.

यावेळी अजित डोवाल यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत पुण्यात शिक्षणादरम्यान लोकमान्य टिळकांचे विचार जवळून अनुभवल्याचे सांगितले. ब्रिटिश राजवटीच्या काळात जेव्हा संपूर्ण देश भीतीपोटी गप्प बसला होता, तेव्हा लोकमान्य टिळकांनी अत्यंत निर्भीडपणे ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवला होता. अनेक वर्षे तुरुंगवास भोगूनही त्यांनी कधीही समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचा मार्ग सोडला नाही. आजच्या तरुणांनी लोकमान्य टिळकांचे हेच विचार, त्यांचे देशप्रेम आणि संघर्षाचा काळ डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एक सुरक्षित, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी देशातील युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

महसूल शिबिरामुळे एक लाख नागरिकांना लाभ: राहुल नार्वेकर

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software