- Hindi News
- सातारा
- राज्यांतर्गत रब्बी हंगाम पिकस्पर्धेचे आयोजन
राज्यांतर्गत रब्बी हंगाम पिकस्पर्धेचे आयोजन
सातारा: राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छा मनोबलामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यायावत ज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
रब्बी हंगाम २०२५ मध्ये ही पीकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकासाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पुढिलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे.
▪️शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.
▪️स्पर्धेत भाग घेणारया शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल.
▪️पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः
▪️विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२,८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा जोडणे आवश्यक.
▪️बँक खाते चेक पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
▪️या पिक स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क-
सर्वसाधारण गटासाठी रुपये- ३००
आदीवासी गटासाठी रुपये- १५०
या स्पर्धेसाठी तालुका पातळीवर पारितोषिक अनुक्रमे पहिले रुपये ५,००० दुसरे रुपये ३,००० तिसरे रुपये २,००० तसेच जिल्हा पातळीवर अनुक्रमे १०,००० रुपये ७,००० रुपये व ५,००० रुपये एवढे राहील. राज्यपातळीवर पहिले रुपये ५०,००० दुसरे रुपये ४०,००० तिसरे रुपये ३०,००० एवढे असेल. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषि अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
