- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- जागतिक आदिवासी दिनी अनोखा उपक्रम; पालकमंत्र्यांनी कोलाम पाड्यावर साधला संवाद
जागतिक आदिवासी दिनी अनोखा उपक्रम; पालकमंत्र्यांनी कोलाम पाड्यावर साधला संवाद
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जागतिक आदिवासी दिनी कोलाम पाड्यावर दिवस घालवून घेतला 'जनता दरबार'. विविध विकासकामांना दिली मंजुरी.
यवतमाळ: जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बाभूळगाव तालुक्यातील पिंपरी ईजारा येथील इंदिरानगर कोलाम पोडावर जाऊन आदिवासी बांधवांसोबत आपला पूर्ण दिवस व्यतीत केला. जमिनीवर बसून आदिवासी संस्कृतीचा आस्वाद घेत त्यांनी थेट लोकांशी संवाद साधला. या उपक्रमामुळे सत्ता आणि सामान्य जनता यांच्यातील अंतर कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. निसर्गाशी एकरूप झालेल्या आदिवासी संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पोडावर पोहोचताच मोरपिसांचा पारंपरिक टोप परिधान करून आदिवासी बांधवांसोबत ढोलाच्या तालावर फेर धरला. यावेळी त्यांनी भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर शामादादा कोलाम, राणी दुर्गावती आणि वीर बापुराव शेडमाके यांसारख्या महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करत आदिवासी वारशाचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सर्वात भावूक वैशिष्ट्य म्हणजे पालकमंत्री संजय राठोड यांनी आदिवासी महिलांचा सन्मान करत केलेले मातृवंदन. गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत ओवाळून केले, तर काही ज्येष्ठ महिलांनी पाय धुवून स्वागत केले असता, पालकमंत्र्यांनीही त्या महिलांचे पाय धुवून त्यांना आदरांजली वाहिली. या प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. आपल्या बोली भाषेचा अभिमान बाळगतच आधुनिक शिक्षण घेत प्रगती करावी, असे भावनिक आवाहन त्यांनी कोलाम समाजातील तरुणांना केले. आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी गावच्या चावडीवर ‘जनता दरबार’ भरवला. यावेळी त्यांनी केवळ आश्वासने न देता, उपस्थित अधिकाऱ्यांना तत्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले.
कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र निधीची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावात सुसज्ज अभ्यासिका, वाचनालय, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बससेवा, उच्च शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती आणि पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रे उभारण्याचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यास त्यांनी प्रशासनाला सांगितले. याशिवाय महिला बचत गटांना बळकट करून स्थानिक उद्योगांना चालना देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आदिवासी पोडाच्या समस्यांच्या निरंतर पाठपुराव्यासाठी एका विशेष स्वीय सहायकाची नियुक्ती केल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाचा समारोप सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या स्नेहभोजनाने झाला. आदिवासी संस्कृतीतील परंपरेनुसार पालकमंत्र्यांनी चावडीवर सर्वांसोबत काळा चहा घेतला आणि त्यानंतर जमिनीवर मांडी घालून झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिला भजनी मंडळाला साहित्याचे वाटप आणि खेळाडूंना क्रिकेट किट देऊन त्यांच्यातील कौशल्याला प्रोत्साहन दिले. शासन जेव्हा स्वतःहून वंचितांच्या उंबरठ्यावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेते, तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय आणि समावेशक विकासाची पहाट होते, ही भावना या कार्यक्रमानंतर सर्वत्र व्यक्त होत आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचा हा संवेदनक्षम उपक्रम केवळ एक राजकीय दौरा न ठरता, आदिवासी बांधवांच्या मनात विश्वासाची नवी उमेद निर्माण करणारा ठरला आहे.
