- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- उमरीत क्रांती दिन उत्साहात; स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला पालकमंत्री संजय राठोडांकडून अभिवादन
उमरीत क्रांती दिन उत्साहात; स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला पालकमंत्री संजय राठोडांकडून अभिवादन
यवतमाळच्या उमरी (शहीद) येथे क्रांती दिन उत्साहात साजरा. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि १ लाख ११ हजार वृक्षलागवडीचा शुभारंभ.
यवतमाळ: यवतमाळ ही संघर्ष आणि स्वाभिमानाची परंपरा लाभलेली भूमी असून, स्वातंत्र्य चळवळीत या मातीतील स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व अतुलनीय आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि त्यांचे महान योगदान आजच्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. बाभूळगाव तालुक्यातील उमरी (शहीद) येथील हुतात्मा स्मारकात क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या सोहळ्याची सुरुवात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. यावेळी त्यांनी हुतात्मा यशवंत लुडबाजी पाळेकर आणि शहीद मधुकर घोटेकर यांच्यासह स्वातंत्र्य संग्रामातील सर्व वीरांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन केले. आपल्या भाषणात पालकमंत्री राठोड यांनी आजचा दिवस देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली, म्हणूनच आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जगत आहोत. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ असून, देशाला विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग मोलाचा आहे, असेही ते म्हणाले. केवळ सीमेवर लढणे म्हणजे देशसेवा नसून, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांसारख्या प्रत्येक घटकाने आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहून कर्तव्य पार पाडणे, हीच खरी राष्ट्रसेवा आहे, असे महत्त्वाचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
क्रांती दिनाच्या निमित्ताने जात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या भिंती ओलांडून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या महत्त्वपूर्ण दिवशी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन’ या विशेष कालावधीत १ लाख ११ हजार वृक्षलागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वृक्षारोपण मोहिमेमुळे पर्यावरणाचे जतन आणि संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचणार आहे.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमरी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री राठोड यांनी या चिमुरड्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले. यावेळी शहीद पत्नी संगीता घोटेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, नगराध्यक्ष संगीता मालखुरे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी राष्ट्रहितासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेत हा क्रांती दिन उत्साहात साजरा केला.
