- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- महाराष्ट्रात पुन्हा नामांतराची चर्चा; बुलढाण्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ नावाची मागणी
महाराष्ट्रात पुन्हा नामांतराची चर्चा; बुलढाण्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ नावाची मागणी
अहिल्यानगरनंतर आता बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' करण्याची मागणी. आमदार श्वेता महाले यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश.
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या शहरांच्या व जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि अहिल्यानगर नामांतरा नंतर आता राज्यातील आणखी एका प्रमुख जिल्ह्याचे नाव बदलण्याची अधिकृत मागणी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला आमदार श्वेता महाले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. या मागणीची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रशासनाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात बुलढाणा जिल्ह्याचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहे. जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करणारे लोणारचे प्रसिद्ध व खगोलशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचे सरोवर, विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेले आणि संत श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शेगाव, मेहकर येथील श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य आणि सैलानी बाबा दर्गा यांसारख्या अनेक धार्मिक व पर्यटन स्थळांनी हा जिल्हा समृद्ध झाला आहे. या सर्व वैभवासह बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा ही पराक्रमी राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी असणे संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांच्या कोवळ्या वयात त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बीज रोवले, त्यामुळेच सातशे वर्षांच्या परकीय व जुलमी राजवटीतून महाराष्ट्र आणि देश मुक्त होऊ शकला, असे या पत्रात आवर्जून स्पष्ट करण्यात आले आहे.
राजमाता जिजाऊसाहेबांच्या या अमूल्य कार्याची व उपकारांची साक्ष म्हणून त्यांच्या जन्मभूमीचा सन्मान करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून “राजमाता जिजाऊनगर” करण्यात यावे, अशी आग्रही विनंती करण्यात आली आहे. जगभरातून धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊंचे महान विचार जगभर पोहोचण्यास मदत होईल, असे पत्रात म्हटले आहे. अहिल्या नगरच्या धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण करण्याचा निर्णय घेतल्यास देशभरातील समस्त शिवप्रेमींमध्ये मोठा आनंद निर्माण होईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. आमदार श्वेता महाले यांनी हे पत्र सोशल मीडियावर देखील शेअर केले असून, मातृतीर्थ सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊंची जन्मभूमी असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युग पुरुषाला घडवण्यात त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. या नव्या नामांतराच्या मागणीमुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून, यावर शासन आणि प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
