- Hindi News
- पुणे
- कामशेतमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर; ५ लाख खर्चूनही स्वच्छता कोलमडली
कामशेतमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर; ५ लाख खर्चूनही स्वच्छता कोलमडली
मावळातील व्यापारी केंद्र असलेल्या कामशेतमध्ये कचऱ्याची गंभीर समस्या. दरमहा ५ लाख खर्चूनही अस्वच्छता; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप.
तळेगाव दाभाडे: तिन्ही मावळातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामशेत शहरात सध्या कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. रस्त्यांच्या कडेला, मुख्य बाजारपेठेत आणि विविध वसाहतींमध्ये ठिकठिकाणी कचरा पसरल्याने पावसामुळे या कचऱ्याची दुर्गंधी सुटली असून, डास आणि माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीच्या ढिसाळ स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांकडून तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
कामशेत हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असल्यामुळे दररोज हजारो शेतकरी, व्यापारी, नागरिक आणि विद्यार्थी या परिसरातून नियमित ये-जा करतात. मात्र, सध्या मुख्य बाजारपेठ, कामशेत-पवनानगर रस्ता, इंद्रायणी नदी परिसर, देवराम दत्त कॉलनीसह अनेक महत्त्वाच्या भागांत कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचे पाणी आणि उघड्यावर साचलेला कचरा एकत्र आल्यामुळे रस्त्यांच्या कडेला मोठा चिखल झाला असून, या कुजणाऱ्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे पादचारी व रहिवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, कामशेत ग्रामपंचायतीकडे कचरा संकलनासाठी दोन पिकअप वाहने, तीन ट्रॅक्टर आणि सुमारे वीस कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच कचरा टाकण्यासाठी दरमहा ६५ हजार रुपये भाड्याची जागाही उपलब्ध करून देण्यात आली असून, या संपूर्ण स्वच्छता व्यवस्थेवर दरमहा तब्बल पाच लाख रुपयांचा खर्च केला जात असल्याचे सांगण्यात येते. एवढा मोठा निधी खर्च करूनही शहरातील कचरा वेळच्या वेळी उचलला जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वाहने आणि कर्मचारी उपलब्ध असतानाही शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे डोंगर का साचत आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत कचरा कुजून निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे विविध संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येबाबत प्रतिक्रिया देताना ग्रामविकास अधिकारी धनाजी देशमुख यांनी स्पष्ट केले की, काही जण बाहेरून टेम्पोद्वारे कचरा आणून थेट शहरातील रस्त्यांच्या कडेला टाकत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे बेजबाबदारपणे कचरा टाकणाऱ्यांवर यापुढे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन स्वच्छता यंत्रणा अधिक वेगाने कार्यान्वित करावी, अशी आग्रही मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे.
