- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने समाजकारण व राजकारणाचा आधारवड हरपला – मुख्यम...
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने समाजकारण व राजकारणाचा आधारवड हरपला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बिहार, पश्चिम बंगाल व त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व राजकीय क्षेत्राची मोठी हानी - मुख्यमंत्री फडणवीस.
मुंबई: शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील आपल्या अफाट कार्याद्वारे समाजकारण आणि राजकारणात मोलाचे योगदान देणारे, तसेच अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी नेतृत्व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राज्याने एक दूरदर्शी शिक्षणमहर्षी गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तीव्र शोकभावना व्यक्त केल्या आहेत. बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल असलेले पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राची अपूरणीय हानी झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे की, डॉ. पाटील यांनी आपल्या नावाप्रमाणेच संपूर्ण आयुष्य ज्ञानाची आराधना करण्यात आणि शिक्षण क्षेत्राला समर्पित केले. एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला त्यांचा हा जीवनप्रवास खरोखरच थक्क करणारा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोनशे शैक्षणिक संस्था, विविध प्रकारची आठ विद्यापीठे आणि लाखो विद्यार्थी असा त्यांच्या कार्याचा प्रचंड विस्तार झाला. विशेषतः वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि आर्किटेक्चर यांसारख्या वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची स्थापना करून त्यांनी महाराष्ट्राचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावला. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सोयी-सुविधांचे जाळे देखील प्रभावीपणे विस्तारले.
राजकारणात दोन वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून काम केल्यानंतरही, डॉ. पाटील यांचे खरे मन शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातच रमले. याच क्षेत्रातून त्यांनी अनेक भव्य-दिव्य शैक्षणिक संकुले उभी केली, तसेच जागतिक दर्जाचे 'डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियम' सारखे मोठे प्रकल्प साकारून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. ते नेहमीच सहकार, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक चळवळींचे बळकट आधारवड राहिले.
आयुष्यभर शिक्षण, सेवा आणि निस्सीम विनम्रतेची मूल्ये त्यांनी जपली. ‘अहंकार म्हणजे जीवनाचा मृत्यू; तर अहंकाराचा मृत्यू म्हणजेच खरे जीवन’ हा त्यांचा विचार त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचे खरे प्रतिबिंब होता, असे मुख्यमंत्री म्हणाले. आज त्यांचे पार्थिव अस्तित्व आपल्यात नसले, तरी त्यांनी रुजवलेली शिक्षण सेवेची परंपरा, आदर्शाची शिकवण आणि समाज हिताची मूल्ये कायम पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. या दुःखद प्रसंगी डॉ. पाटील यांच्या परिवारावर आणि त्यांच्याशी जोडलेल्या सर्व संस्था व समूहांवर ओढवलेल्या दुःखात आपण सहभागी असून, या सर्वांना हे असीम दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिल्याचे स्पष्ट केले आहे.
