- Hindi News
- सातारा
- १५ वर्षांनंतर हरवलेला तरुण सुखरूप घरी परतला; उंब्रज परिसरात आनंदाचे वातावरण
१५ वर्षांनंतर हरवलेला तरुण सुखरूप घरी परतला; उंब्रज परिसरात आनंदाचे वातावरण
कराड तालुक्यातील कोटी येथील बेपत्ता रोहन थोरात तब्बल १५ वर्षांनंतर सुखरूप घरी परतला. उंब्रज पोलिसांत हजेरी; कुटुंबीयांमध्ये आनंदाश्रू.
कराड: आयुष्याच्या एका कठीण वळणावर, कौटुंबिक तणावामुळे घर सोडून गेलेला तरुण तब्बल १५ वर्षांनंतर सुखरूप आपल्या घरी परतल्याची अत्यंत भावूक घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात घडली आहे. १३ जानेवारी २०११ रोजी आईच्या निधनानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत घर सोडणारा रोहन कृष्ण थोरात (वय ३०, रा. कोटी, ता. कराड) हा तरुण १० ऑगस्ट २०२६ रोजी अचानक आपल्या घरी परतला. तब्बल दीड दशकानंतर मुलगा परतल्याने त्याच्या वडिलांसह सर्व नातेवाईकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. याप्रकरणी नातेवाईकांनी रोहनला सोबत घेऊन उंब्रज पोलीस ठाण्यात हजर होत पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
१३ जानेवारी २०११ रोजी रोहन कृष्ण थोरात हा वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राहत्या घरातून निघून गेला होता. त्यानंतर त्याचा कुठेही पत्ता लागला नव्हता. याप्रकरणी कुटुंबीयांनी तातडीने पावले उचलत उंब्रज पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर नंबर ०३/२०११ अन्वये हरवल्याची अधिकृत नोंद केली होती. घटनेनंतर पोलिसांकडून आणि नातेवाईका कडून त्याचा कसून शोध घेण्यात आला, मात्र बरीच वर्षे उलटूनही रोहनचा सुगावा लागला नव्हता. अखेर, १५ वर्षांचा मोठा काळ लोटल्यानंतर रोहन १० ऑगस्ट २०२६ रोजी स्वतःहून घरी परतला.
रोहन घरी परतल्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याला घेऊन त्वरित उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी नियमानुसार व कायदेशीर प्रक्रियेनुसार रोहन कृष्ण थोरात याची सखोल चौकशी केली. या चौकशीत सदर व्यक्ती हीच २०११ मध्ये हरवलेली रोहन थोरात असल्याचे पूर्णपणे निष्पन्न झाले. तब्बल १५ वर्षांनंतर आपला लाडका मुलगा सुरक्षितपणे परतल्याचे पाहून त्याचे वडील आणि नातेवाईक अक्षरशः भावुक झाले. या कठीण काळात पोलिसांनी दाखवलेले सहकार्य आणि नोंदवलेली नोंद यामुळेच हा सुखद प्रसंग अनुभवता आल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष ‘मिसिंग शोध मोहीम’ प्रभावीपणे राबवली जात आहे. या धडाकेबाज मोहिमेमुळे अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध लागून विखुरलेली कुटुंबे पुन्हा एकत्र येत आहेत. उंब्रज पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पोलीस प्रशासनाप्रती नागरिकांमधून कृतज्ञता व्यक्त होत आहे.
