- Hindi News
- देश
- संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित
संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार गदारोळ. गृहमंत्री अमित शाह यांच्या स्पष्टीकरणाची मागणी; लोकसभा व राज्यसभा कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित.
नवी दिल्ली: संसदेच्या चालू मान्सून अधिवेशनाला आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले असताना, संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे. १३ ऑगस्ट रोजी मान्सून अधिवेशन संपण्यापूर्वी संसदेत तीव्र संघर्ष पाहायला मिळत असून, विविध ज्वलंत मुद्द्यांवरून कोणतीही बाजू माघार घेण्यास तयार नाही. राम मंदिरातील चढ़ावा चोरीच्या प्रकरणावर चर्चा आणि दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात येऊन स्पष्टीकरण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेससह सर्वपक्षीय विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रचंड गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावे लागले आहे.
आजच्या दिवसाच्या सुरुवाती पासूनच लोकसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. “गृहमंत्री सभागृहात येऊन उत्तर द्या,” अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन निदर्शने केली. यामुळे संसदेचे कामकाज सुरळीत चालवणे प्रशासना समोर मोठे आव्हान ठरले आहे. केवळ सभागृहाच्या आतच नव्हे, तर संसद भवन परिसराबाहेरही सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. विरोधी पक्षांनी केंद्राच्या धोरणा विरोधात निदर्शने केली, तर भाजप खासदारांनी झारखंडमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्यावरून तीव्र संताप व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या काही दिवसांपासून संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने खडाजंगी सुरू आहे. कालही दोन्ही बाजूंनी जवळपास एकाच वेळी निदर्शने केल्याने संसद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मान्सून अधिवेशनाचे केवळ दोनच दिवस उरले असताना, एका बाजूला विरोधक विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षही आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे उर्वरित दोन दिवसांतही संसदेच्या कामकाजात गदारोळ कायम राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
