- Hindi News
- सातारा
- वाईच्या विकासावरून राजकारण तापले; अनिल सावंतांचा विरोधकांवर हल्लाबोल
वाईच्या विकासावरून राजकारण तापले; अनिल सावंतांचा विरोधकांवर हल्लाबोल
वाई नगरपरिषदेच्या विकासकामांवरून व वृक्षछाटणी वादावरून नगराध्यक्ष अनिल सावंत आक्रमक. विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देत दिला कडक इशारा.
सातारा: वाई नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीका आणि वृक्षतोडीवरून निर्माण झालेल्या वादानंतर, वाईचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. “मी थांबणारा कार्यकर्ता नाही, घाबरणाराही नाही. माझी कोणतीही राजकीय खुर्ची ही ताकद नसून माझी खरी ताकद वाईकर जनता आहे,” असे सांगत त्यांनी विकासकामांत अडथळे आणणाऱ्या घटकांना सज्जड दम दिला आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी वाईच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.
वाई शहराच्या विकासात्मक दृष्टीने नगर परिषदेकडून हाती घेण्यात आलेल्या विविध कामांकडे काही मंडळी केवळ राजकीय चष्म्यातून पाहत असल्याचा आरोप नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केला. काही राजकीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि वृक्षप्रेमींच्या नावाचा आडोसा घेऊन आपल्यावर आणि विकासकामांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करत आहेत, असे ते म्हणाले. मात्र, स्वतःच्या वैयक्तिक राजकारणापेक्षा वाईचा विकास आणि सर्वसामान्य नागरिकांचे हित हे आपल्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी वाईकरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कटिबद्ध आहे. जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवून मला नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे, त्या विश्वाला तडा जाऊ देणार नाही,” असे सांगत ते म्हणाले की, मी कुठल्याही मोठ्या राजकीय घराण्यातून आलो नाही किंवा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही; मी एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या वेदना आणि अडचणी मला चांगल्याच ठाऊक आहेत.
दरम्यान, अलीकडेच मंडई परिसरात सुरू असलेल्या वृक्ष छाटणीवरून विरोधकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी मोठा वाद निर्माण केला होता. यावर स्पष्टीकरण देताना नगराध्यक्ष सावंत म्हणाले की, “मंडई परिसरातील धोकादायक झाडांची छाटणी ही तेथील गोरगरीब महिला आणि भाजी विक्रेत्यांच्या मागणी वरूनच करण्यात आली आहे. वाई अर्बन बँक, जिल्हा बँक आणि आसपासच्या परिसरातील वयोवृद्ध व्यापारी व नागरिकांच्या जीवाला या जीर्ण व वाळवी लागलेल्या झाडांमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. झाडांची खोडे वाळवीमुळे पूर्णपणे कमकुवत झाली होती. मी स्वतः एक हाडाचा शेतकरी असून माझ्या शेतात आणि विविध प्रकल्पांत शेकडो झाडे लावून ती जोपासली आहेत; त्यामुळे पर्यावरणाचे महत्त्व मला उत्तम कळते. पर्यावरणाचे रक्षण झालेच पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही, परंतु विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधत शहर वासियांची सुरक्षा सुनिश्चित करणेही तितकेच आवश्यक आहे. प्रत्येक विकास कामाकडे केवळ संकुचित राजकीय विरोधाच्या भूमिकेतून पाहणे अत्यंत चुकीचे आहे.”
“मला ‘याची जिरव, त्याची जिरव’ किंवा ‘गाडा-गाडी’चे कोणतेही राजकारण करायचे नाही. माझे राजकारण सूडाचे नसून ते समाजाच्या आणि शहराच्या हिताचे आहे. कोणाला त्रास देणे हा माझा अजिबात अजेंडा नाही. वाईकरांचे जीवनमान उंचावणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देणे हेच माझे एकमेव ध्येय आहे,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आपल्याला रोखण्याचा किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उत्तर देताना सावंत भावनिक झाले आणि म्हणाले, “जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यांच्याच बळावर मी उभा आहे. वाईचा विकास हा माझा एकट्याचा विषय नसून तो आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. जर वैयक्तिक व संकुचित राजकारणामुळे वाईच्या विकासाला खीळ बसणार असेल, तर ते वाईकरांचे मोठे दुर्दैव ठरेल. विकास थांबवण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असेल, तर तो वाईकरांच्या हिता विरोधात आहे. मतभेद असतील तर त्यावर बसून चर्चा करूया, सूचना असतील तर नक्की स्वीकारूया; पण विकासाच्या आड कोणीही येऊ नये. वाईकरांच्या हितासाठी मी प्रसंगी दोन पावले मागे जाण्यासही तयार आहे, पण जनतेची सेवा करताना मी विकासाच्या मार्गावरून एक पाऊलही मागे हटणार नाही,” असा कडक इशारा व स्पष्ट संदेश नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी विरोधकांना दिला आहे.
