- Hindi News
- पुणे
- पिंपरी-चिंचवडमध्ये खड्ड्यांवर आयुक्तांचा दणका; ४८ तासांत बुजवण्याचे आदेश
पिंपरी-चिंचवडमध्ये खड्ड्यांवर आयुक्तांचा दणका; ४८ तासांत बुजवण्याचे आदेश
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कडक निर्देश! ४८ तासांत रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश; हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा.
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांच्या समस्येबाबत महापालिका प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे आगामी दोन दिवसांत (४८ तासांत) तातडीने बुजवण्यात यावेत, असे स्पष्ट आणि कडक निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कामामध्ये कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
शहरातील रस्ते, पदपथ आणि इतर सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीच्या कामांना महापालिकेकडून आता वेग देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, नागरिकांच्या तक्रारींची वाट पाहत बसण्याऐवजी सर्व विभागीय कार्यकारी अभियंत्यांनी, उपअभियंत्यांनी आणि कनिष्ठ अभियंत्यांनी स्वतःहून आपापल्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करावी आणि आवश्यक असलेल्या कामांची नोंद घ्यावी. रस्त्यांवर खड्डे भरताना कामाचा उच्च दर्जा, टिकाऊपणा आणि नागरिकांची सुरक्षितता या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
केवळ खड्ड्यांची दुरस्तीच नव्हे, तर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या रस्त्यावरील लोखंडी रेलिंग, दुभाजकांवरील (Dividers) बॅरिकेड्स आणि पदपथांची पाहणी करून ही सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यासाठी क्षेत्रीय कार्यालयानिहाय कामांचे अचूक नियोजन करून प्राधान्यक्रम ठरविण्यात येत आहे. या सर्व विकास आणि दुरुस्ती कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता आणि सह शहर अभियंता दररोज कामांचा सविस्तर आढावा घेणार असून, प्रत्येक दिवसाच्या प्रगतीचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.
नागरिकांना सुरक्षित, सुस्थितीत आणि अतिशय दर्जेदार रस्ते व सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिका प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सक्रिय होऊन तातडीने दुरुस्ती पूर्ण करावी, अन्यथा सुरक्षेशी संबंधित कामांमध्ये कसूर केल्यास संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असा पुनर्रुच्चार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केला आहे. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
