- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- ‘नव भारत’ घडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा; राज्यपाल जिष्णु देव वर्मांचे आवाहन
‘नव भारत’ घडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा; राज्यपाल जिष्णु देव वर्मांचे आवाहन
नाशिकमधील चतुर्वेद संमेलनात राज्यपाल जिष्णु देव वर्मांचे मार्गदर्शन. युवकांनी एआय, तंत्रज्ञान आणि वेद परंपरेची सांगड घालत नव भारत घडवण्याचे केले आवाहन.
नाशिक: युवकांनी आधुनिक विज्ञानाचे शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्या सोबतच आपल्या प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत एक सक्षम 'नव भारत' घडवावा, असे महत्त्वपूर्ण आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले आहे. महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक येथे आयोजित ‘चतुर्वेद संमेलन तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात’ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या भव्य सोहळ्याला महापौर हिमगौरी आडके-आहेर, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, वेदाचार्य रवींद्र पैठणे, प्रतिष्ठानचे संस्थापक ब्रह्मर्षी पंडित शिवकुमार शर्मा, उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे संचालक डॉ. नीलाभ तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि वेद अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा समजून घेण्यासोबतच जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP 2020) या दिशेने तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देत आहे. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा यांचा योग्य समन्वय साधल्यास भारत अधिक सामर्थ्यवान बनू शकतो. महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानतर्फे समर्पण भावाने वेद परंपरेचे संरक्षण व संवर्धनाचे जे मोलाचे कार्य केले जात आहे, ते अत्यंत प्रशंसनीय आहे. ही संस्था युवकांना आपल्या मूळांशी जोडण्याचे आणि आजच्या काळात वैदिक मूल्यांची माहिती देण्याचे महत्त्वाचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल गौरवोद्गार काढताना राज्यपाल म्हणाले की, नाशिक हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून भारताच्या आध्यात्मिक व ज्ञानपरंपरेचे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा परिसर स्थापित होत आहे ही राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. राज्यातील विद्यार्थी, संशोधक आणि संस्कृतचे अभ्यासक यांनी या केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आगामी काळात नाशिक हे वैदिक आणि संस्कृत अध्ययनाचे एक प्रमुख राष्ट्रीय केंद्र म्हणून नावा रूपाला येईल, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. वेद हे केवळ प्राचीन ग्रंथ नसून ते आपल्या भविष्यातील सामर्थ्याचे उगमस्थान आहेत, त्यामुळे वेदांचे संरक्षण, त्यावर संशोधन आणि त्यातील जीवनमूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण व महाभारतासारख्या ग्रंथांमधील विचार सुलभ माध्यमातून शिकवले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
या सोहळ्यात केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे संचालक डॉ. नीलाभ तिवारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नाशिक येथे सुरू होत असलेल्या या केंद्रामुळे वेदाच्या अभ्यासाची आणि प्रसाराची नवी पिढी तयार होण्यास मोठी मदत होईल. तसेच कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे यांनी नाशिकच्या पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वाबद्दल सांगत संस्कृत विद्यापीठामुळे ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालणे शक्य होईल, असे नमूद केले. प्रतिष्ठानचे सचिव वेदराचार्य रवींद्र पैठणे यांनी संस्थेच्या गेल्या २५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा सादर केला. कार्यक्रमा दरम्यान राज्यपाल महोदयांच्या हस्ते वेदशास्त्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्वानांना आणि मान्यवरांना ‘राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. या पुरस्कारांमुळे मानवतेला सत्य, धर्म आणि विश्वकल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या महान ज्ञानपरंपरेचा सन्मान झाला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
