- Hindi News
- पुणे
- पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा इन्स्पेक्टर २२ लाखांच्या लाच प्रकरणात जाळ्यात; एसीबीची मोठी कार...
पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा इन्स्पेक्टर २२ लाखांच्या लाच प्रकरणात जाळ्यात; एसीबीची मोठी कारवाई!
पुणे: दारू विक्रीचा परवाना आणि मायक्रो ब्रेव्हरीची फाईल मंजूर करून देण्यासाठी तब्बल २२ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ११ लाख रुपये स्वीकारण्याचे निष्पन्न झाल्याने राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या इन्स्पेक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे पुणे महसूल आणि उत्पादन शुल्क विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शास्त्रीनगर, येरवडा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 'एच झोन'मध्ये कार्यरत असलेले इन्स्पेक्टर जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७, रा. कोथरूड, पुणे; मूळ रा. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षीय लायसन्स कन्सलटंट व्यवसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार नोंदवली होती.
तक्रारदाराच्या अशिलाच्या फर्मसाठी 'एफ एल ३' चा परवाना मिळवून देणे आणि त्याच फर्मची 'मायक्रो ब्रेव्हरी'ची फाईल मंजूर करून देण्याच्या कामासाठी इन्स्पेक्टर पाटील यांनी सुरुवातीला अनुक्रमे १२ लाख आणि ८ लाख रुपये, अशी एकूण २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदाराने १० एप्रिल २०२६ रोजी एसीबीकडे दाद मागितली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने १३ एप्रिल, २१ मे आणि २२ मे २०२६ रोजी पंचांसमक्ष या तक्रारीची सखोल पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान आरोपी इन्स्पेक्टर पाटील यांनी मूळ मागणीत वाढ करून २२ लाख रुपयांची लाच मागितली व तडजोडीअंती ११ लाख रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर आज, १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी जितेंद्र पाटील यांना ५:१० वाजता अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सतीश वाळके आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता एसीबीच्या 1064 या टोल-फ्री क्रमांकावर अथवा पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
