- Hindi News
- सातारा
- महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर काळाचा घाला; आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ५०० फूट दरीत कोसळली, साताऱ्यातील ८...
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर काळाचा घाला; आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ५०० फूट दरीत कोसळली, साताऱ्यातील ८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू
पोलादपूर: रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या अत्यंत धोकादायक अशा आंबेनळी घाटात रविवारी रात्री एक भीषण आणि काळीज हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन तब्बल ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील सर्व मृत हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, आसगाव आणि सातारा शहरा परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक महाबळेश्वर किंवा कोकण परिसरात फिरण्यासाठी आले असावेत असा अंदाज आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान प्रवास करत असताना, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली. घाटातील तीव्र वळणे आणि रात्रीचा अंधार यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, महाबळेश्वर व पोलादपूर पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल आणि कठीण भूप्रदेशाची असल्याने रात्रीच्या अंधारात मदतकार्य राबवताना शोध पथकाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. रविवारी मध्यरात्रीपर्यंत बचाव पथकाच्या हाती दोन मृतदेह लागले होते.
आज सोमवार उजाडताच दरीमध्ये शोधमोहिमेला पुन्हा वेग देण्यात आला असून उर्वरित ६ मृतदेह बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अद्याप सर्व मृतांची नावे आणि ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, सातत्याने अपघातांचे केंद्र ठरत असलेल्या आंबेनळी घाटातील या ताज्या दुर्घटनेमुळे सातारा आणि रायगड जिल्ह्यांवर मोठी शोककळा पसरली आहे.
