- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; नितेश राणेंचे कडक निर्देश
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; नितेश राणेंचे कडक निर्देश
कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्ग प्रशासन ॲक्शन मोडमध्ये. २५ सप्टेंबरपर्यंत सर्व यंत्रणांनी अलर्ट राहण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश.
सिंधुदुर्ग: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आणि सर्व जिल्हावासीयांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी तसेच नागरिकांना अत्यंत सुरक्षित, शांततापूर्ण आणि आनंददायी वातावरणात सण साजरा करता यावा, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आगामी २५ सप्टेंब रपर्यंत पूर्णपणे अलर्ट मोडवर राहून परस्पर समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी सविस्तर आढावा घेतला. मागील बैठकीत दिलेल्या सूचनांच्या पूर्ततेची पाहणी केल्यानंतर त्यांनी उत्सव कालावधीतील विविध व्यवस्थांबाबत संबंधित विभागांना कडक सूचना दिल्या.
या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह देशभरातून मोठ्या संख्येने चाकरमानी व नागरिक आपल्या गावी परतत असतात. त्यामुळे या कालावधीत रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा, कायदा व सुव्यवस्था आणि आपत्कालीन सेवा या सर्व बाबी अत्यंत सक्षम आणि विनाअथळा सुरू ठेवण्याची आवश्यकता पालकमंत्र्यांनी बोलून दाखवली.
उत्सवा दरम्यान जिल्ह्यात वाढणारी वाहनांची संख्या आणि संभाव्य रहदारी लक्षात घेता वाहतूक नियोजन प्रभावीपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रमुख मार्गांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ तैनात करावे आणि गणेशमूर्ती घेऊन जाणारी वाहने तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्यास सांगण्यात आले. याशिवाय, आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवून ग्रामीण व शहरी भागातील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधसाठा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले गेले. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे आणि मार्गावर योग्य प्रकाश व्यवस्था करण्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने मिरवणूक मार्ग, विसर्जन स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. प्रशासनातील सर्व विभागात उत्तम समन्वय असावा आणि कोणतीही समस्या निर्माण होण्याची वाट न पाहता संभाव्य अडचणींवर आधीच उपाययोजना कराव्यात, असे सांगत जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव अत्यंत शांततामय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जय्यत तयारी केल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोदमिसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
