- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- पर्यटन विकासाचा मोठा निर्णय; राज्यात नव्या पर्यटक निवासांना मंजुरी
पर्यटन विकासाचा मोठा निर्णय; राज्यात नव्या पर्यटक निवासांना मंजुरी
MTDC च्या १७९ व्या बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची मोठी घोषणा. दाजीपूर, औंढा-नागनाथ अन् लोणार येथे नवे पर्यटक निवास उभारणार.
मुंबई: महाराष्ट्राची अफाट पर्यटन क्षमता, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आणि समृद्ध निसर्गसंपदेचा प्रभावी उपयोग करून राज्याला देश-विदेशातील पर्यटकांचे अग्रगण्य पर्यटनस्थळ बनविण्यासाठी पर्यटन विकासाच्या कामांना अधिक वेग दिला जाणार आहे. पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासोबतच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यावर शासनाचा विशेष भर असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) संचालक मंडळाची १७९ वी महत्त्वाची बैठक पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली, ज्यामध्ये राज्याच्या पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
मंत्रालयात पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र सोनवणे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एमटीडीसीच्या ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत या बैठकीत पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा झाली. दाजीपूर, औंढा-नागनाथ आणि लोणार या ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवर नवीन पर्यटक निवास उभारण्याचे काम सुरू असून, यासोबतच महामंडळाच्या विविध रिसॉर्ट्सच्या आधुनिकीकरणाची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, गणपतीपुळे येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासाने १० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा विक्रमी टप्पा पार करत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांची व पर्यटकांची सोय डोळ्यांसमोर ठेवून नाशिकमध्ये ‘यात्री निवास योजना’ राबविण्याचा प्रस्तावही या बैठकीत मांडण्यात आला. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटकांना सहज माहिती उपलब्ध व्हावी यासाठी नवीन संकेतस्थळ, मोबाईल ॲप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चॅटबॉट यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. जल, निसर्ग, वन्यजीव आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण महोत्सव व उपक्रम राबविले जात असून, यात प्रामुख्याने कोयना जलपर्यटन, पक्षी निरीक्षण, कासव संवर्धन आणि वन्यजीव सहलींवर विशेष भर दिला जात आहे. याशिवाय, पीएम गतिशक्ती पोर्टलशी प्रकल्पांचे समाकलन, जबाबदार व शाश्वत पर्यटन, वैद्यकीय पर्यटन यावर भर देण्यात आला असून, नुकत्याच पार पडलेल्या ओटीएम २०२६ आणि ग्लोबल कोकण महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पर्यटन जागतिक स्तरावर प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. महामंडळाची आर्थिक शिस्त, प्रशासकीय कार्यक्षमता आणि मालमत्ता व्यवस्थापन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या असून, या सर्व नियोजनामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रात मोठे सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
