- Hindi News
- पुणे
- पुण्यात ५० कोटींच्या जमिनीचा धक्कादायक प्रकार; परस्पर गहाण ठेवून घेतले दीड कोटींचे कर्ज
पुण्यात ५० कोटींच्या जमिनीचा धक्कादायक प्रकार; परस्पर गहाण ठेवून घेतले दीड कोटींचे कर्ज
पुण्यातील येरवडा येथे ५० कोटींची जमीन परस्पर गहाण ठेवून १.५ कोटींचे कर्ज लाटल्याप्रकरणी रश्मी एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकावर गुन्हा दाखल.
पुणे: पुण्यातील येरवडा येथील नामवंत रश्मी एज्युकेशन सोसायटीच्या मालकीची सुमारे ५० कोटी रुपये बाजारमूल्याची बहुमूल्य जमीन कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना परस्पर गहाण ठेवून १ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज लाटल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संस्थेच्या संस्थापक नीला मनोहरलाल गुप्ता यांच्यासह तिघांविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे शैक्षणिक आणि कायदेशीर वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी रश्मी एज्युकेशन सोसायटीचे सचिव परमेश्वर व्यंकटराव सोळुंके (वय ५९, रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नीला मनोहरलाल गुप्ता, रश्मी मनोहरलाल गुप्ता आणि सुलभा मोडक (रा. येरवडा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ही फसवणुकीची घटना येरवड्यातील रश्मी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात २२ जानेवारी २०२६ पासून वेगवेगळ्या टप्प्यांत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, नीला गुप्ता यांनी १९८४ मध्ये रश्मी एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून तिची धर्मादाय आयुक्तांकडे कायदेशीर नोंदणी केली होती. या संस्थेच्या ताब्यात २ एकर ३४ आर जागा असून, तिथे प्रि-प्रायमरी ते दहावीपर्यंतची शाळा चालवली जाते. २००७ मध्ये शाळा आर्थिक अडचणीत असल्याचा दावा करत नीला गुप्ता यांनी नवीन विश्वस्तांना संस्थेत सामावून घेतले होते. त्यानंतर नवीन विश्वस्तांनी स्वखर्चाने ही शासकीय लीजवरील जमीन संस्थेच्या नावावर करून घेतली आणि शाळेच्या इमारतीचे बांधकाम व इतर पायाभूत सुविधा विकसित केल्या. मात्र, २०१७ मध्ये नीला गुप्ता यांनी इतर विश्वस्तांना अंधारात ठेवून त्यांचे कथित खोटे राजीनामे तयार केले आणि लोक अदालतीच्या माध्यमातून बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करत नवीन विश्वस्त मंडळ तयार केल्याचा वाद निर्माण झाला. याविरोधात जुन्या विश्वस्तांनी कायदेशीर लढा दिला असता, धर्मादाय आयुक्तांनी नीला गुप्ता यांना संस्थेच्या विश्वस्त मंडळातून अधिकृतपणे कमी केले होते. तसेच याप्रकरणी सध्या उच्च न्यायालयात खटला प्रलंबित असून न्यायालयाने सहधर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
संस्थेचे कायदेशीर विश्वस्त मंडळ वेगळे असताना आणि नीला गुप्ता यांना संस्थेच्या मालमत्तेसंदर्भात कोणताही कायदेशीर अधिकार नसतानाही, त्यांनी संगनमताने २२ जानेवारी २०२६ रोजी संस्थेच्या नावावर असलेली ५० कोटी रुपयांची जमीन मुंबईतील ‘अवान्से फायनान्शिअल सर्व्हिसेस’ या संस्थेकडे नोंदणीकृत गहाण खताद्वारे तारण ठेवली. या मालमत्तेच्या आधारे स्वतःच्या फायद्यासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचे भरभक्कम कर्ज देखील लाटण्यात आले. विशेष म्हणजे, हा व्यवहार करताना धर्मादाय आयुक्त कार्यालयाची कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आली नाही.
ही जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ प्रवर्गातील असल्याने त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेणे बंधनकारक असताना, ती सुद्धा जाणून बुजून घेण्यात आली नाही. कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना कोट्यवधींची मालमत्ता परस्पर गहाण ठेवून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या अर्जाची सखोल चौकशी केल्यानंतर अखेर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
