- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मोदींसोबत २० मिनिटांची चर्चा; अमोल कोल्हेंनी सांगितला भेटीचा तपशील
मोदींसोबत २० मिनिटांची चर्चा; अमोल कोल्हेंनी सांगितला भेटीचा तपशील
खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. नाशिक-पुणे रेल्वे व चाकण एमआयडीसीवर चर्चा; अमोल कोल्हेंनी दिली सविस्तर माहिती.
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील आठ खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींसोबत सुमारे २० मिनिटे सविस्तर चर्चा केली. या भेटी दरम्यान मतदार संघातील रखडलेले प्रश्न, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प, चाकण एमआयडीसी आणि इंद्रायणी मेडिसिटी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर गंभीर चर्चा झाल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
या भेटीत कोणत्याही राजकारणा पेक्षा पूर्णपणे मतदार संघातील विकासकामे आणि धोरणात्मक निर्णयांवर (Policy Making) भर देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेल्या माहिती नुसार, बैठकीत नाशिक-पुणे सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्प, चाकण एमआयडीसीची दुरवस्था आणि वाढती वाहतूक कोंडी यांसारखे कळीचे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडण्यात आले. चाकणमधील रस्त्यांच्या कामासाठी ५९ कोटी रुपयांचे टेंडर मंजूर होऊनही प्रत्यक्षात परिस्थितीत सुधारणा झालेली नाही, याकडे लक्ष वेधत वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी प्रमुख मागणीही या शिष्टमंडळाने केली. याशिवाय, खासदार निलेश लंके यांनी आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडले.
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या भेटीनंतर शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा आणि विविध राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, खासदार अमोल कोल्हे यांनी या सर्व चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. या भेटीचा कोणताही राजकीय उद्देश, पक्षप्रवेश किंवा संभाव्य समीकरणांशी संबंध नाही, असे सांगत त्यांनी या केवळ मतदार संघाच्या विकासा साठी घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच, आगामी 'डिलिमिटेशन' (सीमांकन) विधेयका बाबतही बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अद्याप अस्तित्वात नसलेल्या किंवा संसदेत सादर न झालेल्या विधेयकावर आगाऊ अंदाज बांधणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी राजकीय अफवांना पूर्णविराम दिला.
चर्चे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यक्षमतेचे आणि अनुभवाचे कौतुक केल्याचेही कोल्हे यांनी आवर्जून सांगितले. आरोग्य विषयक मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना पंतप्रधानांनी हे गौरवोद्गार काढले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी, या शिष्टमंडळाने केवळ जनहिताचे आणि विकासाचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून ही भेट घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
