- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- ‘एक अटल भारत’ नाट्यप्रयोगातून अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली; १५ ऑगस्टला मुंबईत आयोजन
‘एक अटल भारत’ नाट्यप्रयोगातून अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली; १५ ऑगस्टला मुंबईत आयोजन
सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम! १५ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील दीनानाथ मंगेशकर सभागृहात 'एक अटल भारत' नाट्यप्रयोग; सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश.
मुंबई: देशाचे माजी पंतप्रधान, प्रख्यात संसदपटू, प्रतिभावान कवी आणि दूरदर्शी राष्ट्रनेते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृति दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे ‘एक अटल भारत’ या विशेष मराठी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. हा बहुप्रतिक्षित नाट्यप्रयोग शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता विलेपार्ले (पूर्व) येथील स्टेशनसमोरील दीनानाथ मंगेशकर सभागृहात होणार आहे. विशेष म्हणजे, हा सांस्कृतिक कार्यक्रम सर्व नाट्यप्रेमी आणि नागरिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असणार असून, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या प्रभावी नेतृत्वाने, लोकशाही मूल्यांवरील दृढ निष्ठेने आणि राष्ट्रहिताला सदैव प्राधान्य देणाऱ्या विचारांनी भारतीय राजकारणावर व सार्वजनिक जीवनावर एक अमिट असा ठसा उमटविला आहे. त्यांच्या याच महान राष्ट्रदृष्टिकोनाला आणि सार्वजनिक जीवनातील अतुलनीय योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘एक अटल भारत’ या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन विशाल सोनावणे यांनी केले असून, या नाटकाची संकल्पना अमरजीत मिश्र यांची आहे. रविंद्र प्रोडक्शनच्या कसलेल्या कलाकारांकडून या नाटकाचे सादरीकरण होणार असून, याद्वारे अटलबिहारी वाजपेयी यांचे विचारविश्व, त्यांचे बहुरंगी व्यक्तिमत्त्व आणि राष्ट्रसेवेचा प्रेरणादायी प्रवास रंगमंचावर अत्यंत प्रभावीपणे उलगडला जाणार आहे.
हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या विशेष संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. याद्वारे राज्यभर विविध नाट्य, संगीत, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य संचालनालया तर्फे सातत्याने केले जात आहे. देशभक्ती, लोकशाही मूल्ये आणि महान राष्ट्रनेत्यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे मुंबई व परिसरातील सर्व नाट्यरसिक, विद्यार्थी, तरुण वर्ग आणि नागरिकांनी या विशेष नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संचालनालया तर्फे पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
