- Hindi News
- सातारा
- सातारा जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सातारा जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सातारा (दि. २९):
आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत होणार असल्याच्या काही चुकीच्या अफवा सातारा जिल्ह्यात पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि पंपांवर गर्दी करून विनाकारण साठेबाजी न करण्याचे कडक आवाहन केले आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि इंडियन ऑईल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) व हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) या प्रमुख ऑईल कंपन्यांचे विक्री अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला असता, साताऱ्यातील इंधन पुरवठ्याची सद्यस्थिती पूर्णपणे समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले.
सातारा जिल्ह्यात सध्या एकूण ३३८ पेट्रोल पंप कार्यरत आहेत. जिल्ह्याला शेजारील हवेली (पुणे), मिरज (सांगली) आणि पाकणी (सोलापूर) या तीन वेगवेगळ्या ऑईल डेपोमधून नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी दररोज ६ लाख लिटर (६०० किलोलीटर) पेट्रोल आणि १० लाख लिटर (१००० किलोलीटर) डिझेलची विक्री होते. या दैनंदिन गरजेच्या तुलनेत आजघडीला सातारा जिल्ह्यात २७ लाख ७६ हजार लिटर (२७७६ किलोलीटर) पेट्रोल आणि ३६ लाख ७१ हजार लिटर (३६७१ किलोलीटर) डिझेलचा मोठा साठा शिल्लक आहे.
तसेच ऑईल कंपन्यांकडूनही जिल्ह्याच्या मागणीनुसार दररोज पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. इंधन पुरवठा करणारे तिणीही मुख्य डेपो सातारा जिल्ह्याच्या अगदी जवळ असल्याने वाहतुकीत किंवा पुरवठ्यात कोणताही खंड पडणार नाही, असे ऑईल कंपन्यांनी बैठकीत स्पष्ट केले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही चिंतेशिवाय आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावेत आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
