- Hindi News
- सातारा
- वाई एमआयडीसीतील गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
वाई एमआयडीसीतील गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
सातारा जिल्ह्यातील वाई MIDC मधील गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग. लाखोंच्या मूर्ती व साहित्य जळून खाक, अग्निशमन केंद्राच्या अभावावर प्रश्नचिन्ह.
वाई: गणेशोत्सवाच्या तोंडावर सातारा जिल्ह्यातील वाई औद्योगिक वसाहतीतून (MIDC) एक अत्यंत दुर्दैवी आणि खळबळ जनक बातमी समोर आली आहे. वाई MIDC परिसरातील एका गणेशमूर्ती निर्मिती कारखान्याला मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली. रंग, थिनर आणि अन्य ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्यामुळे या आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले, ज्यामुळे कारखान्यातील तयार गणेशमूर्ती, गौरीच्या मूर्ती, कच्चा माल आणि मौल्यवान साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ऐन सणाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे कारखाना मालक, कामगार आणि गणेश भक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
‘वैभव आर्ट हस्तकला महिला उद्योग’ तथा बावळेकर गौरी-गणपती मूर्ती कारखान्यात गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीची माहिती मिळताच वाईसह पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज, फलटण आणि सातारा येथून अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता आणि धुराचे प्रचंड लोट यामुळे आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना प्रचंड कसरत करावी लागली. सलग पाच ते सहा तास अथक प्रयत्न केल्यानंतर पहाटेच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी, महावितरणचे कर्मचारी आणि स्थानिकांनी घटना स्थळी धाव घेत गर्दी नियंत्रित करत मदत कार्यात सहकार्य केले. शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून पोलीस प्रशासना कडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
या भीषण अग्निकांडामुळे वाई MIDC मधील पायाभूत सुविधांचा आणि आपत्कालीन यंत्रणेचा बोजवारा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. MIDC परिसरात स्वतःचे अग्निशमन केंद्र, आपत्कालीन रुग्णवाहिका किंवा प्रथमोपचार केंद्रासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर बाहेरील तालुक्यां मधून मदत मागविण्याची नामुष्की ओढवत असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पथदिव्यांचा अभाव, स्पीड ब्रेकर नसणे आणि कामगारांसाठी सुरक्षिततेची कोणतीही पुरेशी व्यवस्था नसणे या गंभीर समस्यांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे मूलभूत सुविधांचा वानवा असताना दुसरीकडे बेकायदा धंद्यांना मोकळे रान मिळाले असल्याची चर्चा परिसरात आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या औद्योगिक वसाहतीत सुरक्षेच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर आता प्रशासनाने आणि उद्योजक संघटनांनी केवळ निवेदने देण्या पलीकडे जाऊन ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे तीव्र मत स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.
