- Hindi News
- सातारा
- साताऱ्यात विकासकामांना वेग; बाळासाहेब देसाई स्मारक आणि प्रतापगड संवर्धनावर भर
साताऱ्यात विकासकामांना वेग; बाळासाहेब देसाई स्मारक आणि प्रतापगड संवर्धनावर भर
साताऱ्यात पोवई नाक्यावरील बाळासाहेब देसाई स्मारक आणि प्रतापगड संवर्धन कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा. एआय व्हिडिओ क्लिपसह विविध विकासकामांचे निर्देश.
सातारा: सातारा शहरातील ऐतिहासिक पोवई नाक्यावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाचे उर्वरित सर्व काम अत्यंत वेगाने आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. लवकरच या भव्य स्मारकाचे लोकार्पण होणार असल्याने संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीने कामाला गती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला नगराध्यक्ष अमोल मोहिते, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोनपे, तहसीलदार अनंत गुरव, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकी दरम्यान ऐतिहासिक प्रताप गडावरील संवर्धन आणि विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गडावरील संवर्धनाची सर्व कामे आगामी तीन महिन्यांच्या आत पूर्ण करावीत, असे आदेश पालक मंत्र्यांनी दिले. प्रताप गडाला भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना आणि शिव प्रेमींना या गडाचा जाज्वल्य इतिहास योग्य प्रकारे समजावा, यासाठी तज्ज्ञ इतिहास कारांच्या मदतीने एक विशेष पटकथा तयार करण्यात यावी. तसेच गडावर येणाऱ्या नागरिकांसाठी सुमारे ७० जणांची बसण्याची क्षमता असलेले एक सुसज्ज प्रेक्षागृह तयार करण्यात यावे. या संपूर्ण संवर्धन प्रकल्पाची गुणवत्ता कायम राखण्यासाठी आणि कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी एकाच मुख्य एजन्सीची नियुक्ती करावी. विशेष म्हणजे, बांधकाम विभागाने प्रताप गडाचा इतिहास आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध सुविधांची माहिती देणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित एक आकर्षक व्हिडिओ क्लिप तयार करावी, अशा नाविन्य पूर्ण सूचनाही श्री. देसाई यांनी केल्या.
या बैठकीत पाटण तालुक्यातील बोर्गेवाडी (मेंढोशी) गावाच्या पुनर्वसना बाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या गावातील ८९ कुटुंबे बाधित असून, त्यांचे मौजे सडा वाघापूर येथे पुनर्वसन करण्यासाठी योग्य ती जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही जागा अंतिम करून प्रत्येक बाधित कुटुंबाला किमान तीन गुंठे जागा मिळवून द्यावी. या पुनर्वसनाचा सविस्तर व सकारात्मक प्रस्ताव तयार करून तो तातडीने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करंजे नाका येथे आगामी काळात उभारण्यात येणाऱ्या सैनिक संकुलच्या नियोजित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. या विविध विकास कामांच्या वेगवान अंमल बजावणीमुळे सातारा जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
