नवी मुंबईत १४-१५ सप्टेंबरला राजभाषा संमेलन; राजकीय चर्चांना उधाण

नवी मुंबईत १४ व १५ सप्टेंबर रोजी 'अखिल भारतीय राजभाषा संमेलन'. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

मुंबई: महाराष्ट्रामध्ये भाषा आणि प्रादेशिक अस्मितेवरून राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना, आगामी १४ आणि १५ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात सहावे ‘अखिल भारतीय राजभाषा संमेलन’ पार पडणार आहे. या भव्य राष्ट्रीय संमेलनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली असून, या आयोजनामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

        या दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलनासाठी देशभरातून हिंदी भाषेतील नामवंत साहित्यिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सिडको प्रदर्शन केंद्राचा संपूर्ण परिसर कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. देशभरातून हजारो प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने १० हजारांहून अधिक वाहनांसाठी भव्य पार्किंग व्यवस्था करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत गणेशोत्सव आणि गणपती विसर्जनाची लगबग सुरू असल्याने शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.

        सध्या महाराष्ट्रात सर्व रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्याच्या निर्णयावरून मोठे राजकीय रणकंदन माजले आहे. एका बाजूला हा वाद सुरू असताना आणि शिष्टमंडळाच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ दिल्याची चर्चा ताजी असताना, आता या राष्ट्रीय हिंदी संमेलनाच्या आयोजनामुळे मराठी-अमराठी वादाला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. भाषाविषयक मुद्द्यांवर आधीच आक्रमक असलेल्या विरोधी पक्षांच्या आणि प्रादेशिक संघटनांच्या भूमिकेमुळे, मुंबईच्या वेशीवर होत असलेल्या या केंद्राच्या हिंदी संमेलनाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत. आगामी काळात भाषा, परवाने आणि राष्ट्रीय संमेलन या मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण आणखी तापण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

आरोग्यसेवेला आता ‘स्टार रेटिंग’; हलगर्जीपणावर थेट कडक कारवाई

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software