पुण्यात रंगणार ‘रेफकोल्ड इंडिया २०२६’; १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान भव्य प्रदर्शन

रेफ्रिजरेशन व कोल्ड चेन क्षेत्रातील 'रेफकोल्ड इंडिया २०२६' प्रदर्शन १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान पुण्यात. ३०० हून अधिक स्टॉल्स अन् जागतिक तज्ज्ञांचा सहभाग.

पुणे: रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन क्षेत्रातील जगभरातील तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण संशोधने आणि व्यावसायिक संधी एकत्र आणणारे दक्षिण आशियातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषद असलेल्या ‘रेफकोल्ड इंडिया २०२६’ (Refcold India 2026) चे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स (ISHRAE) च्या वतीने हे भव्य प्रदर्शन आगामी १९ ते २१ नोव्हेंबर २०२६ दरम्यान येथील ऐतिहासिक कृषी महाविद्यालय ग्राउंडवर (Agriculture College Ground) आयोजित करण्यात आले आहे. रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन क्षेत्रातील उद्योजकांसाठी ‘कुंभमेळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीन दिवसीय सोहळ्यात भारत भरातून तसेच परदेशातील हजारो उद्योग व्यावसायिक, उत्पादक, तंत्रज्ञान पुरवठादार, कंत्राटदार, धोरणकर्ते, शासकीय प्रतिनिधी आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

       पुण्याची ओळख ही देशभरात “भारतातील रेफ्रिजरेशनची राजधानी” म्हणून निर्माण झाली असून, शहरात या क्षेत्रातील व्यावसायिक, उत्पादक, अभियंते आणि तंत्रज्ञांचे एक अत्यंत मजबूत आणि सक्षम नेटवर्क अस्तित्वात आहे. ‘इशरे’च्या पुणे चॅप्टरने या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान, कौशल्य आणि व्यावसायिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रेफ्रिजरेशन हँडबुक्स, कोल्ड स्टोरेज बेसिक्स व डिझाइन गाइड्स, तांत्रिक लेख, सादरीकरणे तसेच ‘रेफकॉन’ आणि ‘ग्रीन कॉन्क्लेव्ह्ज’ यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्ञानाची देवाणघेवाण आणि उद्योगाच्या सर्वांगीण विकासाला पुण्यातून मोठी चालना मिळाली आहे. हीच ऐतिहासिक आणि औद्योगिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन यंदाच्या प्रदर्शनासाठी पुणे शहराची विशेष निवड करण्यात आली आहे.

         अन्नसुरक्षा, औषधनिर्मिती, आरोग्यसेवा, आधुनिक शेती आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांसाठी रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन पायाभूत सुविधा आता अत्यंत कळीच्या आणि मूलभूत गरजा बनल्या आहेत. या सर्वच क्षेत्रांमध्ये सध्या अभूतपूर्व तांत्रिक बदल घडून येत आहेत. वाढता ऊर्जा वापर, पाण्याचा अपव्यय, पर्यावरणावरील दुष्परिणाम तसेच उच्च ग्लोबल वार्मिंग पोटेन्शिअल (GWP) असलेल्या पारंपरिक रेफ्रिजरंट्सचा वापर यांसारख्या जागतिक आव्हानांना तोंड देताना उद्योगाने आता ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली, शाश्वत रेफ्रिजरंट्स, स्मार्ट तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे. ‘रेफकोल्ड इंडिया २०२६’ मध्ये या सर्व अत्याधुनिक आणि भविष्यवेधी तंत्रज्ञानाचे प्रभावी प्रदर्शन केले जाणार असून, उद्योगापुढील नवीन आव्हाने, बाजारपेठेतील संधी आणि भविष्यातील विकासाच्या दिशांवर सखोल मंथन होणार आहे.

         या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ३०० हून अधिक अत्याधुनिक स्टॉल्स उभारण्यात येणार असून, त्यात भविष्यासाठी सज्ज उत्पादने व प्रणालींचे थेट प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची व्याख्याने, उद्योग जगतातील मान्यवरांच्या सहभागाने होणाऱ्या पॅनेल चर्चा आणि परिसंवादांचे आयोजन या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. याशिवाय, उत्कृष्ट प्रकल्प, प्रणाली आणि उपकरणांसाठी प्रतिष्ठित ‘रेफ्कोल्ड अवॉर्ड्स’, संशोधन व नाविन्याला हुरूप देणारी ‘ग्लोबल पोस्टर स्पर्धा’, ‘इशरे वुमेन मेंबर्स अँड इंत्रप्रिन्योर्स प्रोग्राम’ तसेच नवीन उत्पादने व व्यावसायिक भागीदारी शोधण्यासाठी एक विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

         स्मार्ट तंत्रज्ञान, शाश्वत रेफ्रिजरेशन प्रणाली आणि ऊर्जा-कार्यक्षम पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखत तापमान-नियंत्रित पुरवठा साखळी अधिक विश्वासार्ह व कार्यक्षम कशी बनवता येईल, यावर या परिषदेत विशेष भर दिला जाणार आहे. अन्नसुरक्षा, औषधनिर्मिती आणि कृषी क्षेत्रासाठी कोल्ड चेन पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नाविन्य पूर्ण तंत्रज्ञानाचा व उपायांचा प्रसार याद्वारे होईल, अशी माहिती रेफकोल्ड इंडिया २०२६ चे चेअरमन अरविंद सुरंगे, सुभाष खनाडे, दीपक वाणी आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पुण्याची मजबूत अभियांत्रिकी पार्श्वभूमी आणि देशात वेगाने वाढणारी कोल्ड चेनची गरज पाहता, हे संमेलन दक्षिण आशियाई पातळीवर उद्योग जगतात एक नवा मैलाचा दगड ठरणार आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

आरोग्यसेवेला आता ‘स्टार रेटिंग’; हलगर्जीपणावर थेट कडक कारवाई

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software