- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रवाशांना दिलासा; ९ सप्टेंबरपासून विशेष गाड्यांची सेवा
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रवाशांना दिलासा; ९ सप्टेंबरपासून विशेष गाड्यांची सेवा
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेचा मोठा दिलासा. ९ सप्टेंबरपासून २६२ गणपती विशेष ट्रेन फेऱ्या धावणार.
मुंबई: गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असतानाच, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि विनासायास व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत दिलासा दायक पाऊल उचलले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह राज्यातील विविध भागांतून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, येत्या ९ सप्टेंबरपासून तब्बल २६२ गणपती विशेष ट्रेन फेऱ्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या विशेष रेल्वे सेवेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १ लाख १७ हजारांहून अधिक प्रवाशांनी आपल्या तिकिटांचे बुकिंग केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावरील ताण आणि प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे व्यापक नियोजन केले आहे. जाहीर करण्यात आलेल्या एकूण २६२ विशेष ट्रेन फेऱ्यांपैकी २०० फेऱ्या आरक्षित (Reserved) स्वरूपाच्या असणार असून, उर्वरित ६२ फेऱ्या अनारक्षित (Unreserved) असणार आहेत. या आरक्षित विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित (AC) डबे, स्लीपर तसेच जनरल डब्यांचा समवेश असलेल्या विविध गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या श्रेणीतील प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या दिवसांत कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग काही मिनिटांत फुग होते आणि चाकरमान्यांना तिकीट मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हीच अडचण ओळखून मध्य रेल्वेने आधीच गाड्यांची संख्या वाढवल्यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सोपा होण्यास मदत होणार आहे. विशेषतः अनारक्षित फेऱ्यांमुळे ऐन वेळी प्रवास करणाऱ्या किंवा वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, कोकण वासीयांचा यंदाचा गणेशोत्सव अधिक आनंददायी आणि सुखकर होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
